वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टर येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव झाला होता. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. या सामन्यात रोहित, राहुल आणि कर्णधार कोहली प्रत्येकी केवळ एका धावेवर तंबूत दाखल झाले होते. भारताच्या या निराशाजनक खेळीवर अभिनेत्री राखी सावंतने जोरदार टीका केली आहे. ‘तुम्ही वर्ल्ड कपसाठी खेळायला गेला होतात की हनिमूनसाठी,’ असा सवाल तिने विराट कोहली व रोहित शर्माला विचारला आहे.

‘खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत का गेले आहेत. हे काही हनिमून नाही. पाच वर्षांत एकदाचा वर्ल्ड कप येतो आणि हा चषक आपला झाला असता. वर्ल्ड कपनंतर तुम्ही मनाला वाटेल तिथे पत्नीसोबत फिरू शकता. पण आता खेळावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं होतं,’ अशा शब्दांत ती राग व्यक्त करताना दिसतेय. इतकंच नव्हे तर हे ‘वर्ल्ड कप’पेक्षा ‘हनिमून कप’ असल्यासारखं वाटतंय, अशीही टीका तिने केली. सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : इंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक

उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर अनेकांनी टीका केली होती तर काहींनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळीचं कौतुक केलं होतं. दरम्यान सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे.