बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या आपल्या आगामी ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ऋषी कपूर नेहमीच ओळखले जातात. या चित्रपट प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्युझिक कंपन्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांचा राग अनावर झाला. ‘मी अशा अनेक लोकांना भेटलोय जे म्युझिक कंपनींच्या एकाधिकारशाहीमुळे वैतागले आहेत. या कंपन्या कलाकारांचं शोषण करत असल्याचा आरोप ऋषी कपूर यांनी केला.
याविषयी ते पुढे म्हणाले की, ‘सध्याच्या घडीला गाणी ऐकण्यापेक्षा जास्त पाहिली जातात. आजकाल म्युझिक कंपन्यांकडे चांगली गाणी घेऊन गेलो तर या गाण्यांचं रिंगटोन नाही होऊ शकत, अशी कारणं दिली जातात. आता रिंगटोनसारख्या गोष्टींना विचारात घेऊन गाण्यांची निर्मिती करावी लागते. त्यामुळे चांगल्या गाण्यांची निर्मिती कशी होईल? संगीत क्षेत्रात उत्तम काम होत नसल्याने संगीत दिग्दर्शक वैतागले आहेत. आम्हाला जे काम करायचं आहे, ते मिळत नसल्याची तक्रार अनेक कलाकारांनी माझ्याकडे मांडली.’
PHOTOS: अदनान सामीच्या चिमुकलीला मोदींनी दिला आशीर्वाद
यावेळी ऋषी कपूर यांनी थेटपणे कोणत्याही म्युझिक कंपनीचं नाव घेतली नाही. ‘काही म्युझिक कंपन्यांची गुंडगिरी इतकी वाढली आहे की ते गायकांकडून असे काही करार मान्य करुन घेतात, ज्यामध्ये गायक स्वतंत्रपणे काम नाही करु शकत. जे गायक म्युझिक कंपन्यांचं ऐकत नाहीत त्यांना काम मिळणं अवघड होऊन जातं,’ अशी टीकाही त्यांनी केली. ऋषी कपूर यांचा ‘पटेल की पंजाबी शादी’ हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबतच परेश रावल यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.