आमिर खान, सलमान खान, करिष्मा कपूर आणि रवीना टंडन या अफलातून कलाकारांचा वेड लावणारा अंदाज अपना अपना हा सिनेमा तुम्हाला माहिती आहे का? सिनेभक्तांना हा सिनेमा माहिती नाही असे होणे अशक्यच. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा तो फारसा गाजला नव्हता. मात्र नंतर त्यातले विनोद, अभिनय सगळ्याच गोष्टी तुफान गाजल्या.

या सिनेमातील प्रत्येक दृश्य आणि संवाद चाहत्यांना तोंडपाठ आहेत. लवकरच ‘अंदाज..’ चा सिक्वेल येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. हा सिनेमा आजही प्रसिद्ध असण्याचे मुख्य कारण म्हणजे अमर- प्रेमही जोडी. ही जोडी प्रसिद्ध करणारे आमिर खान आणि सलमान खान या दोघांना मात्र सिक्वेलमधून डच्चू देण्यात आला आहे. या जोडगोळीऐवजी रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि वरुण धवन यांपैकी दोघांची निवड होण्याची शक्यता आहे.

मिशाला पाहताचक्षणी शाहिदने दिली अशी रिअॅक्शन

१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अंदाज अपना अपना सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं. लवकरच संतोषी याचा सिक्वेल काढणार असून, मूळ सिनेमातील एकही मुख्य कलाकार सिक्वेलमध्ये नसणार, अशी माहिती मिळत आहे. यापूर्वी आमिर आणि सलमानचीच सिक्वेलसाठी निवड झाली होती. पण आता या दोघांनाही या सिनेमातून वगळण्यात आलं आहे. रविना आणि करिष्मा या अभिनेत्रींना पहिल्यापासूनच सिनेमापासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे आता या सिनेमात दोघींची जागा कोण घेणार हा आता मोठा प्रश्न आहे.

सिक्वेलची कथा काय असेल याचा अंदाज बांधला जात असताना रविना एका मुलाखतीत म्हणाली होती की, ‘माझा आणि करिष्माचा फोटो भिंतीवर टांगला असेल. मग आमिर आणि सलमान म्हणतील आमच्या बायका मेल्या, आता आम्ही काय करु आणि मग ते २१ वर्षांच्या हिरोईनमागे पळतील.’

आदेश बांदेकरांच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवडीला निलेश राणेंचा विरोध

सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीने डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘कोणताही विनोद खरा वाटावा त्यासाठी निष्पाप चेहऱ्याची फार गरज असते. जेव्हा हा सिनेमा चित्रीत करत होतो तेव्हा सलमान आणि आमिर दोघंही तरुण होते. आता जर सिक्वेलमध्ये त्यांना घ्यायचे झाले तर ते बळजबरीने निष्पाप असल्याचा आव आणल्यासारखे वाटतील. मात्र २० वर्षांचे हिरो असले, तर ते जास्त योग्य वाटेल. तसंच पन्नाशीमधील हिरोंना तरुण हिरोईनमागे पळताना दाखवणं हेही फार वल्गर वाटतं.’

सध्या असे अनेक चांगले तरुण कलाकार आहेत ज्यांच्याकडे कॉमेडीचा सेन्स आहे. यात रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यांची नावं आवर्जून घेण्यासारखी आहेत, असेही संतोषी म्हणाले.