वीस वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या सलमान खानला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. सलमानच्या जामीन अर्जावर उद्या जोधपूर सत्र न्यायालयाने सुनावणी होणार आहे. त्यामुळे सलमानला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे. सलमानला मध्यवर्ती कारागृहाच्या बराक नंबर दोनमध्ये ठेवण्यात आले आहे. या खटल्यात सलमान खानला शिक्षा देण्यात बिष्णोई समाजाची मुख्य भूमिका आहे. शहरी भागातील लोकांना या समाजाबद्दल फारसे काही माहीत नाही. बॉलिवूडच्या 'दबंग' खानलाही शेवटी नमते घ्यायला लावणाऱ्या या समाजाची माहिती कैकांना नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या समाजाबद्दल आधी माहित नसलेली माहिती सांगणार आहोत. बिष्णोई समाज पर्यावरणावर अतोनात प्रेम करणारा समाज आहे. हा समाज राजस्थानच्या मारवाडमध्ये आहे. हा समाज वन्यजीवांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतो आणि पर्यावरण संरक्षणात या समाजाचं योगदान मोठं आहे. या समाजाचे लोक जात- पात धर्म याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हिंदू किंवा मुस्लीम दोन्ही धर्मातील लोक त्याचा स्वीकार करतात. सर्वच जाती-धर्माचे लोक या समाजाची दीक्षा घेतात. एवढंच काय तर या समाजातील महिला या हरिणाच्या पाडसांना आपल्या मुलांप्रमाणेच मानतात. आपल्या पोटच्या पोराला ज्याप्रमाणे प्रेम करावं त्याचप्रमाणे किंबहुना त्याहून जास्त प्रेम त्या या मुक प्राण्यांवर करतात. एकंदरीत या समाजाचे वन्य जीवांवर प्रेम आहे. पण त्यातही हरिणांबद्दल त्यांच्या मनात जास्त आत्मियता आहे. जंगल परिसराक एखादं हरिण किंवा हरिणाचं पाडस एकटं दिसलं तर ते त्याला घरी घेऊन येतात आणि आपल्या कुटुंबाचाच एक भाग बनवतात. महिला हरिणांच्या पाडसांना स्वत:चं दूध पाजतात. एका आईचं कर्तव्य त्या पार पाडतात. मागील ५०० वर्षांपेक्षाही आधीपासून या समाजात पाडसांना दूध पाजायची प्रथा सुरू आहे. अशा परिसरात सलमानने काळवीटाची शिकार केलेली त्यांना कशी आवडेल? काळवीट भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळणारी हरिणाची एक प्रजात आहे. काळवीट मुख्यत: भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात. तर बांगलादेशमधून ही प्रजात नामशेष झाली आहे. २०व्या दशकात अवास्तव शिकार, वृक्षतोडीमुळे काळवीटांच्या संख्या वेगाने घटली होती. त्यामुळेच भारतात १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायदा I अंतर्गत काळवीटाच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली होती. खरंतर बिष्णोई समाज २९ नियमांचं पाल करतो. २९ नियमांचं पालन करत असल्यानेच बिष्णोई शब्द २०(बीस) आणि ९(नौ) बनतो. १४८५ मध्ये गुरु जम्भेश्वर भगवान यांनी बिष्णोई समाजाची स्थापना केली होती. राजस्थानमधील जोधपूर आणि बीकानेरमध्ये या समाजाची मंदिरं आहेत. मुकाम नावाच्या ठिकाणी या समाजाचं मुख्य मंदिर आहे. इथे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या आमावस्येला मोठी जत्रा भरते. या जत्रेला अनेक ठिकाणाहून हजारो भाविक सहभागी होतात. १७३६ मध्ये जोधपूर जिल्ह्याच्या खेजडली गावात बिष्णोई समाजाचे ३०० हून जास्त लोकांनी वृक्ष वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. राजाच्या दरबारातील काही लोक या गावातील झाडं कापण्यासाठी आले होते. पण वृक्षतोडीला विरोध म्हणून या समाजाच्या लोकांनी झाडांना घट्ट मिठी मारली. या समाजाच्या ३०० पेक्षा अधिक लोकांना शहीदाचा दर्जा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या नायिका अमृता देवी, ज्यांच्या नावावर आजही राज्य सरकार अनेक पुरस्कार देतं. बिष्णोई समाजाचा इतिहास वाचल्यानंतर सलमान खानला २० वर्षांनंतर का शिक्षा झाली याचे उत्तर आता प्रत्येकाकडेच असेल. तुमचा हेतू जर चांगला असेल तर तुम्ही कोणाशीही लढायला तयार होऊ शकतात हेच जणू हा समाज सातत्याने दाखवून देत आहेत.