राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असून हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील रणबीरचा लूक पाहता अनेक वेळा प्रत्यक्षात संजयलाच पाहत असल्याचा भास होतांना दिसतो. सर्व स्तरामधून या चित्रपटाचे कौतुक होत असतानाच अभिनेता सलमान खानने मात्र एक वेगळीच प्रतिक्रिया देत सा-यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

काही दिवसापूर्वी ‘संजू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर हुबेहूब संजय दत्तप्रमाणे दिसत आहे. इतकंच नाही तर रणबीरचे डायलॉग्स, त्याचा लूक हा संजयशी तंतोतंत जुळणारा आहे. मात्र तरीदेखील या चित्रपटात रणबीरची निवड केल्यामुळे सलमान खानने एक प्रश्न उपस्थित केला आहे.

‘संजू हा चित्रपट उत्तम असेल यात शंकाच नाही. मात्र या चित्रपटामध्ये संजूची भूमिका वठविण्यासाठी खुद्द संजय दत्तचीच निवड का करण्यात आली नाही. हा चित्रपट संजयच्या जीवनावर आधारित असल्यामुळे या चित्रपटाला संजयने उत्तम न्याय दिला असता. संजयने या सा-या गोष्टी अनुभवल्या आहेत त्यामुळे त्याच्यापेक्षा ही भूमिका कोणताच कलाकार चांगल्या प्रकारे करु शकणार नाही’, असं सलमानने रेस ३ च्या प्रमोशनवेळी म्हटले.

दरम्यान, सलमानच्या या वक्तव्यामुळे एकंदरीत त्याने रणबीरला टोला लगावल्याचे पाहायला मिळत आहे. संजयच्या जीवनावर आधारित ‘संजू’ येत्या २९ जून रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून संजयच्या जीवनात आलेले चढउतार त्याच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहेत.