अभिनेता अनिल कपूर आणि निर्माता बोनी यांच्याप्रमाणे त्यांचा भाऊ संजय कपूर चित्रटपसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यास जवळपास अयशस्वीच ठरला. ‘राजा’, ‘औजार’, ‘सिर्फ तुम’ हे नेमके चित्रपट वगळता संजयचे फार काही चित्रपट चालले नाहीत. त्यानंतर या अभिनेत्याने बऱ्याच वर्षांनी करण जोहरच्या ‘शानदार’ चित्रपटाने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. अखेर संजयने टेलिव्हिजन विश्वाची वाट पकडली. तेथेही त्याला अपयशाचाच सामना करावा लागत असल्याचे दिसते. कारण त्याची ‘दिल संभल जा जरा’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

वाचा : सलमानने लावली जीवाची बाजी!

टेलिव्हिजनच्या माध्यामातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्याची संधी संजयला मिळाली होती. पण ‘दिल संभल जा जरा’चा घसरता टीआरपी पाहता निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला मालिकेने काही महिन्यात जोर धरला नाही तर ती लगेच बंद करण्याचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. त्यामुळे स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिल ढूँढता है’ नंतर आता ‘दिल संभल जा जरा’ मालिकेचा नंबर लागला आहे. येत्या २ फेब्रुवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात येईल.

वाचा : ‘फू बाई फू’ फेम विकास समुद्रे ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल

‘दिल संभल जा जरा’ अजून मुख्य कथानकापर्यंत पोहचलेलीसुद्धा नाही तोवर निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यातील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या मालिकेला सुरुवात झाली होती. सलमानच्या ‘बिग बॉस’सोबत ‘दिल संभल जा जरा’ची टक्कर टाळण्याकरिता मालिकेची वेळही पुढे ढकलण्यात आली होती. तरीही मालिकेला टीआरपीमध्ये सूर गवसला नाही.

मालिका बंद होण्याचे कारण काहीही असो, पण संजयच्या करिअरची गाडी इतक्या वर्षानंतरही रुळावर आलेली नाही हे स्पष्ट दिसते.