रणबीर कपूर आणि आलिया भटट् यांचं अफेअर सध्याच्या घडीला कलाविश्वात सर्वाधिक चर्चेत असणारा विषय ठरत आहे. एकिकडे रणबीरची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, तर दुसरीकडे आलियासोबतच्या त्याच्या नात्यावरही अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणबीर आणि आलियाने एकत्र हजेरी लावली, अगदी तेव्हापासूनच त्याच्या या नव्याकोऱ्या अफेअरने सर्वांचं लक्ष वेधलं.

विविध कार्यक्रम आणि मुलाखतींमध्येही या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे रणबीर आणि आलिया यांनी माध्यमांपासून हे नातं लपवण्याचा प्रयत्न केला असला तरीही एकमेकांप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना काही केल्या लपून राहत नसल्याचं स्पष्ट होत आहे. याची प्रचिती नुकतीच आली. ‘GQ इंड‍िया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नुकतच रणबीरने आलियासोबतच्या नात्यावरचं मौन सोडलं.

आलियासोबतच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चांना दुजोरा देत रणबीर म्हणाला, ‘हे सर्व काही सध्या खूपच नवीन आहे. त्यामुळे आता त्याविषयी काहीही बोलणं म्हणजे खूपच घाई होईल. या नात्याला आणखी वेळ मिळण्याची गरज असून, ते खुलून येण्याची गरज आहे. एक व्यक्ती, एक अभिनेता म्हणून सांगावं तर आलिया सध्या अगदी योग्य मार्गावर आहे. तिचा अभिनय म्हणू नका किंवा एक व्यक्ती म्हणून ती जगत असलेलं आयुष्य म्हणू नका तिच्याकडून ज्या गोष्टी मिळतात त्याची जणू मला माझ्या आयुष्यातच गरज असते.’ आलियासोबतच्या नात्याविषयी बोलताना, आता आपल्या आयुष्यात स्थैर्य आलं असून, नात्यांचं महत्त्वं आपल्याला समजू लागल्याचं त्याने सांगितलं.

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

आलिया आणि रणबीरच्या नात्याविषयी सुरु असणाऱ्या चर्चा आणि त्यादरम्यानच प्रसिद्ध झालेली त्याची ही मुलाखत या सर्व प्रकरणाला एका नव्या वळणावर पोहोचवून गेली आहे. त्यामुळे येत्या काळात हे नवं सेलिब्रिटी कपल त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.