कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यात दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहेत. सध्या या कार्यक्रमाची बरीच चर्चा आहे कारण यामध्ये अनेक नामवंत कलाकार आणि इतर क्षेत्रामधील दिग्गज व्यक्ती त्यांच्याबद्दल बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना सांगतात. या प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळते. या आठवड्यात मातीशी नातं आणि कामाशी इमान जपणाऱ्या अस्सल पाहुण्यांसोबत गप्पा रंगणार आहेत. हे पाहुणे आहेत सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे.

कार्यक्रमात सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आईबरोबरचे काही किस्से प्रेक्षकांना सांगितले. तर कोणाचा फोन आला की जास्त टेंशन येतं, वर्षा बंगला की अर्चना वहिनी?, असा गमतीदार प्रश्न मकरंद अनासपुरेनं विचारला. तुकाराम मुंढेंनी त्याचं उत्तर काय दिलं हे तुम्हाला कार्यक्रमात पाहायला मिळेल. ‘माझ्यासारखे दहा अधिकारी तयार होऊ शकतील पण माझा हा प्रश्न आहे की तुम्ही एक अधिकारी टिकवू शकत नाही तर दहा कसे तयार होतील?,’ अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुसरीकडे सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेल्या ‘वनराई’ उपक्रमाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. झाडे आणि पर्यावरणाविषयी प्रेम व्यक्त करत प्रत्येकाने एकतरी झाड लावा आणि जगवा असं आवाहन त्यांनी कार्यक्रमाद्वारे केलं.

सोलापूरमध्ये व्हीव्हीआयपी पासेस बंद का केले, या प्रश्नाचं उत्तर मुंढेंनी चक्रव्यूह राऊंडमध्ये दिलं. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचा सल्ला दिला. यावेळी मनाला चटका लावून जाणारा अनुभवसुद्धा त्यांनी सांगितला. ‘२००६ साली वाशी नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागात कार्यरत असताना जवळपास १५०० अतिक्रमण काढले आणि त्यावेळी मनाची घालमेल करणारा प्रसंग समोर आला. काय निर्णय घ्यावा हे कळत नव्हतं. पण तो प्रसंग माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता,’ असं ते म्हणाले. तो प्रसंग काय होता आणि त्यावेळी नेमकं काय घडलं ते कार्यक्रमात पाहायला मिळेल. हा भाग येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.