विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. इटलीत अत्यंत निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या लग्नसोहळ्यानंतर विरुष्काने दिल्ली आणि मुंबईत आपल्या मित्रमंडळींसाठी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. मुंबईतील सेंट रेगिस या हॉटेलमध्ये मंगळवारी मोठ्या थाटामाटात रिसेप्शन सोहळा पार पडला. क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातील बरेच सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखच्या हजेरीनेही या सोहळ्यात चार चाँद लावले असे म्हणायला हरकत नाही.

अनुष्काने तिच्या बॉलिवूड पदार्पणातील चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केले. तेव्हापासून किंग खान आणि अनुष्काची मैत्री चांगलीच जमली. या रिसेप्शनमध्येही त्यांच्या मैत्रीचा प्रत्यय आला. ‘चल छैया..’ या गाण्यावर शाहरुख आणि विराटने ठेका धरला, तेव्हा उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. विराटला पंजाबी गाण्यांची फार आवड असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याच्यासोबत शाहरुखने भांगडासुद्धा केला. ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक है जान’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ अशा तीन चित्रपटांमध्ये अनुष्का आणि शाहरुखने एकत्र काम केले. यापैकी ‘जब तक है जान’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादही त्याने अनुष्कासाठी म्हणून दाखवले. सोशल मीडियावर सध्या किंग खानचे रिसेप्शनमधील हे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

रिसेप्शनला अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, कतरिना पासून युवराज सिंग, हरभजन सिंग, नीता अंबानीपर्यंत अनेक बड्या लोकांची मांदियाळी होती.

https://www.instagram.com/p/BdMC9jqF99X/

https://www.instagram.com/p/BdMC4ntgRiU/