‘कांटा लगा’ या गाण्यातून लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. या एकाच गाण्याने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते. शेफालीने २००४मध्ये हरमीत सिंहशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी २००९मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेफाली पुन्हा एकदा प्रेमात पडली. तिने २०१४मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. पण लग्नानंतर शेफालीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. एका मुलाखतीमध्ये शेफालीने याचा खुलासा केला आहे. नुकताच शेफलीने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पहिल्या घटस्फोटानंतरचा अनुभव सांगितला होता. तेव्हा तिला असे वाटले होते की आता सर्व काही संपले आहे. खूप कमी वयात लग्न करुन घटस्फोट घेतल्याने तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण याच कठीण काळात तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने तिला पाठिंबा दिला होता. आणखी वाचा : द फॅमिली मॅन 2 : ‘समांथाने दिलेले ते इंटिमेट सीन्स नंतर डिलीट करण्यात आले’ 'माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की माझा प्रेमावरचा विश्वास उडाला होता. त्यावेळी मला मी पुन्हा प्रेमात पडणार नाही किंवा मी पुन्हा कोणासोबत रिलेशनशीपमध्ये येई शकणार नाही असे मला वाटले होते. पुन्हा लग्न करणं तर लांबच. तो माझ्या आयुष्यातील कठीण काळ होता. पण तो ही निघून गेला' असे शेफाली म्हणाली. त्यानंतर शेफालीला आपल्या समाजात एक महिलेने दुसऱ्यांदा लग्न केल्यावर कसे पाहिले जाते असा प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तर देत शेफालीने संतप्त सवाल केला आहे. ती म्हणाली, 'ही खूप मोठी समस्या आहे. नेहमी महिलांनाचा दोष का दिला जातो आणि पुरुषांना का नाही? पुरुषांनी १० वेळा लग्न केले तरी चालते पण एका महिलेने दुसऱ्यांदा केलेले लग्न चालत नाही?' पुढे शेफाली म्हणाली, 'हिनेच काही तरी केले असणार, हिच्यामध्ये काही तरी कमी असणार, ही तर काटा लगामधील मुलगी आहे, ही खूप बोल्ड आहे.. अरे बास करा! जर तुम्ही पडद्यावर एखादे खलनायकाचे पात्र किंवा बोल्ड सीन दिले असतील तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही खऱ्या आयुष्यात तसेच आहात. आम्ही कलाकार आहोत.'