छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीला तिच्या खासगी आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वी श्वेताचा पती अभिनव कोहोलीला घरगुती हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. या आरोपानंतर त्याला अटक करत न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला होते. या सर्व प्रकरणानंतर आता श्वेता आनंदी असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. दरम्यान हे सर्व प्रकरण माझ्या शरीरातील विष प्रयोग असल्याचे देखील श्वेताने म्हटले आहे.

श्वेताने नुकताच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली आणि आता अखेर आनंदी असल्याचा दावा तिने केला आहे. ‘कोहलीशी झालेले लग्न हे माझ्या शरीराला एक प्रकारचा झालेला विषारी संसर्ग होता आणि आता तो मी संसर्ग शरीरातून काढून टाकला आहे. लोकांना असं वाटते की तो माझ्या हाताचा, शरीराचा भाग आहे पण मला तो विषारी असल्यामुळे शरीरातून बाहेर काढून टाकावा लागला. आता मी निरोगी आहे. तुम्ही असे समजू नका की मी आनंदी असण्याचा आव आणते. खरतर मी सध्या माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे’ असे श्वेता म्हणाली.

त्यानंतर श्वेताने तिला सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगला उत्तर दिले आहे. ‘माझे दुसरे लग्न कसे मोडू शकते? असा प्रश्न उभा करणाऱ्यांना मी प्रश्न विचारेल, का नाही मोडू शकत? संसारात चुकीच्या गोष्टी घडूच शकत नाही का? कमीतकमी माझ्यात या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याचे आणि सर्वांसमोर मांडण्याचे धैर्य आहे. आज मी जे काही केले ते माझ्या मुलांच्या आणि कुटुंबीयांच्या चांगल्यासाठी. असे अनेक लोक आहेत ज्यांचे लग्नानंतरही अफेअर आहेत. मी नक्कीच त्यांच्यापेक्षा स्वत:ला चांगले समजेल’ असे श्वेता पुढे म्हणाली आहे.

श्वेता लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती ‘मेरे डॅड कि दुल्हन’ या मालिकेत झळकणार आहे. इतके वर्षानंतर श्वेता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.