कंगना रणौतने आतापर्यंत जेवढे सिनेमे केले त्यापेक्षा जास्त वादांमुळे ती चर्चेत राहिली. प्रत्येक वादामध्ये कंगनाची स्वतःची अशी एक बाजू असते. ती बाजू काहींना पटते तर काहींना नाही. पण त्या वादात कंगनाला कोणीही डावलून पुढे जाऊ शकत नाही. अभिनयाप्रमाणेच वादांमध्येही ‘क्वीन’ ठरलेल्या कंगनाने नुकताच वांद्रे येथे एक बंगला विकत घेतला. या बंगल्याची किंमत जवळपास २१ कोटी रुपये आहे.

या बंगल्यामध्ये कंगना राहणार नसून, तिचा आगामी सिनेमा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमाच्या कामासाठी बंगल्याचा वापर केला जाणार आहे. या बंगल्याचे नावही तिने याच सिनेमाच्या नावावरुन ठेवले आहे. कंगना या सिनेमात झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमाचे पहिले शेड्युल संपले असून, दुसरे लवकरच सुरू होणार आहे.

कंगनाने वांद्र्याच्या पाली हिल या उच्चभ्रू ठिकाणी बंगला विकत घेतला आहे. या बंगल्याच्या शेजारी दिलीप कुमार, संजय दत्त आणि ऋषी कपूर यांसारखे सुपरस्टार राहतात. कंगनाच्या मॅनेजरने सांगितले की, तीन मजली या बंगल्याची कागदपत्रे सप्टेंबरमध्ये तयार झाली. तीन हजार चौरस फूट असलेल्या या बंगल्याची नोंदणी २० कोटी ७० लाखांमध्ये झाली. लवकरच या बंगल्यामधून कंगना आपले ‘मणिकर्णिका फिल्म्स’ हे प्रॉडक्शन हाऊस सुरू करणार आहे.

‘मणिकर्णिका’ सिनेमानंतर कंगना दिग्दर्शन क्षेत्रातही उतरणार असून ‘तेजू’ या सिनेमाचे ती दिग्दर्शन करणार आहे. लहान मुलांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमात कंगना एका म्हाताऱ्या आजीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.