सध्या संपूर्ण देशात दूरदर्शन वाहिनीवरील ‘रामायण’ ही मालिका पुन्हा पाहण्याचा सर्वजण आनंद घेत आहेत. तर दुसरीकडे रामायणामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका मुलाखतीमध्ये मुकेश खन्ना यांनी ‘सोनाक्षीसारख्या लोकांनी रामायण ही मालिका पाहावी. त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचे आहे’ असा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला टोमणा मारला. त्यानंतर सोनाक्षीच्या वडिलांनी सोनाक्षीला पाठिंबा दिला होता. आता महाभारतामधील दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेते पुनीत इस्सर यांनी सोनाक्षीला पाठिंबा दिला आहे.

नुकताच पुनीत यांनी ‘स्पॉर्टबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुकेश खन्ना यांनी असे करायला नको होते. सोनाक्षी AVM ची विद्यार्थीनी आहे. माझी मुले देखील तेथेच शिक्षण घेत आहेत. सोनाक्षीने रामायणावर आधारित एका प्रश्नाचे उत्तर दिले नाही याचा अर्थ असा नाही की तिला काहीच येत नाही’ असे पुनीत यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुनीत यांनी मुकेश खन्ना यांनी एकता कपूरच्या महाभारतावर केलेले वक्तव्य देखील आवडले नसल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : सोनाक्षीला पाठिंबा देत शत्रूघ्न सिन्हा यांचा मुकेश खन्ना यांना टोला

गेल्या वर्षी सोनाक्षी सिन्हाने अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा सोनाक्षीला हनुमानाने कोणासाठी संजीवनी आणली होती असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला देता न आल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा रामायण मालिका दाखवण्यात येत असल्यामुळे सोनाक्षीला पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे.

काय म्हणाले होते मुकेश खन्ना
“रामायण आणि महाभारत या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांनी याआधी ते पाहिलेच नाही. सोनाक्षी सिन्हासारख्या लोकांनी, ज्यांना हनुमान यांनी कोणासाठी संजीवनी आणली हेसुद्धा माहीत नाही, त्यांनी ही मालिका पाहावी” असे मुकेश यांनी म्हटले होते.