दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि आता आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवलेल्या ३७ वर्षीय प्रभासबद्दल त्याचे चाहते प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला उत्सुक आहेत. प्रभासला काय आवडतं, तो काय करतो यापासून त्याच्या घरी कोण कोण असतं इथपर्यंत जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाला आहे. जेवढी क्रेझ बॉलिवूडच्या स्टार्सची असते तेवढीच किंबहुना त्याहून थोडी जास्त क्रेझ दाक्षिणात्य कलाकारांची असते. चला तर मग कोणता दाक्षिणात्य अभिनेता किती शिकला ते जाणून घेऊ. प्रभास- बाहुबली फेम प्रभास याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. प्रभासने हैदराबाद येथील श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक केलंय. प्रभासने २००२ मध्ये ‘ईश्वर’ सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘वर्षम’ (२००४), ‘छत्रपती’ (२००५), ‘चक्रम’ (२००५), ‘बिल्ला’ (२००९), ‘डार्लिंग’ (२०१०), ‘मिस्टर परफेक्ट’ (२०११), ‘मिर्ची’ (२०१३) या सिनेमांमध्ये काम केलं आहे. रजनीकांत- थलइवा रजनीकांत हे तर दाक्षिणात्य प्रेक्षकांचे दैवतच. त्यांचे चाहते त्यांची देवासारखी पूजा करतात. पण त्यांचं शिक्षण किती झालंय हे फार कमी लोकांना माहिती आहे. ६६ वर्षीय रजनीकांत हे मद्रास फिल्म इन्स्टिट्युटमधून पदवीधर झाले आहेत. रजनीकांत यांनी १९७५ मध्ये ‘रेअर मेलोडिज’ या सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘अवल ओरु तुडर कते’ (१९७४), ‘अनठुलेनी कथा’ (१९७६), ‘छिलाकाम्मा चेप्पिनडी’ (१९७७), ‘खिलाड़ी किट्टू’ (१९७८), ‘भैरवी’ (१९७८), ‘ठिल्लू मुल्लू’ (१९८१)या सिनेमांमध्ये काम केले. तर ‘अंधा कानून’ (१९८३), ‘गिरफ्तार’ (१९८५), ‘फूल बने अंगारे’ (१९९१), ‘फरिश्ते’ (१९९१), ‘तमाचा’ (१९८८) या हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. धनुष- रजनीकांत यांचा जावई अशी काहीशी धनुषची ओळख आहे. पण ही ओळख दाक्षिणात्य भागात अजिबात नाहीये. तिथे तो सुपरस्टारच आहे. पण तुम्हाला माहित आहे का? धनुष हा केवळ १० पर्यंतच शिकलाय. त्याने आतापर्यंत ‘तिरुडा तिरुडी’ (२००३), ‘देवाथायई कन्देन’ (२००४), ‘पोल्लाधवन’ (२००७), ‘मरयां’ (२०१३), ‘नैयांदी’ (२०१३) या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याने २०१३ मध्ये आलेल्या ‘रांझणा’ आणि २०१५ की ‘शमिताभ’ या हिंदी सिनेमातही काम केलं आहे. सूर्या- सूर्या हे सुद्धा दाक्षिणात्य सिनेमांमधलं फार मोठं नाव आहे. ४१ वर्षीय सूर्याने लोयलो कॉलेज चेन्नई येथून बी.कॉम केलं आहे. त्याने १९९७ मध्ये आलेल्या ‘नेररुक्कू नेर’ मधून पदार्पण केलं होतं. त्यासोबतच त्याने ‘काका काका’ (२००३), ‘गजनी’ (२००५), ‘वेल’ (२००७), ‘अयन’ (२००९), ‘सिंघम’ (२०१०), ‘सिंघम’ 2 (२०१३) या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अल्लु अर्जुन- अल्लु अर्जुन याचाही मोठा चाहतावर्ग आहे. ३४ वर्षीय या लोकप्रिय अभिनेत्याने बीबीएचं शिक्षण घेतलं आहे. त्याने २००३ मध्ये आलेल्या ‘गंगोत्री’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘आर्या’ (२००४), ‘बन्नी’ (२००५), ‘हैप्पी’ (२००६), ‘देसमुदुरु’ (२००७), ‘आर्य २’ (२००९), ‘वारुदु’ (२०१०), ‘बद्रीनाथ’ (२०११), ‘सराइनोडु’ (२०१६) या सिनेमांमध्ये काम केलं आहे.