‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९’ लागू झाल्यापासून देशभरात निदर्शने सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. दरम्यान ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील काही विद्यार्थांनी ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ मुस्लिम विरोधी आहे, असे म्हणत आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकारावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याने संताप व्यक्त करत ट्विट केले आहे. या धर्मांध लोकांपासून देशाला वाचवा असे त्याने म्हटले आहे.

काय म्हणाला सिद्धार्थ?

“सर्वप्रथम ते मुस्लिमांना वेगळं करतील. त्यानंतर ख्रिश्चनांना. त्यानंतर इतर धर्मांबद्दलही तेच करतील. अल्पसंख्यकांना वेगळं पाडतील. महिलांच्या हक्काचेही ते हेच करतील. समाजात दुही निर्माण करण्यासाठी प्रत्येक वेळी ते नवा मार्ग शोधतील. तिरस्कारासाठी नव्या युक्त्या शोधून काढतील. हा त्यांचा मार्ग आहे. या धर्मांध लोकांपासून देशाला वाचवा.” अशा आशयाचे ट्विट सिद्धार्थने करुन आपला संताप व्यक्त केले आहे.

यापूर्वी अनुभव सिन्हा, विकी कौशल, पूजा भट्ट, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, रेणूका शहाणे, जावेद जाफरी, हूमा खुरेशी, स्वरा भास्कर यांसारख्या अनेक चित्रपट कलाकारांनी ट्विट करुन जामिया हिंसाचार प्रकरणावर संताप व्यक्त केला होता.