‘सलमान खानचं लग्न’ हा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील गॉसिपचा हॉट टॉपिक ठरला आहे. सलमान कोणाशी लग्न करणार? आणि कधी करणार असा प्रश्न भल्याभल्यांना पडला आहे. सलमानचे नाव आता पर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आले होते. मात्र सलमानच्या लग्नाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे.’ पण आता चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाने सलमानच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

‘हाऊसफूल ४’ चित्रपटाची निर्मिती साजिदने केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साजिद ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचला होता. दरम्यान शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने साजिदला त्याचा खास मित्र सलमान खानच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. ‘साजिद तु आणि सलमानने आयुष्यभर अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण काही दिवसामध्ये तू लग्न केले. सलमानचे लग्न अद्याप झाले नाही असे का?’ असा प्रश्न कपिलने साजिदला विचारला.

त्यावर साजिदने ‘१९९९ मध्ये मी आणि सलमान एकाच दिवशी लग्न करणार होतो. त्याकडे मुलगी होती आणि मला ती शोधावी लागणार होती. मी मुलगी शोधली. दोघांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या. आम्ही जवळच्या ५० लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. लग्नाच्या सहा दिवसआधी सलमान म्हणाला मला लग्न करण्याचा मुड नाही आणि त्याने लग्नाला नकार दिला. त्याने ऐनवेळी त्याचा विचार बदलला. माझ्या लग्नाच्या दिवशी अचानक स्टेजवर आला आणि मला म्हणाला मागे गाडी उभी आहे पळून जा’ असे साजिद म्हणाला.

साजिदने दिव्या भारतीशी लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच तिचा मृत्य झाला. त्यानंतर साजिदने २००० साली वर्धा खानशी लग्न केले.