सुबोध भावे, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली ‘तुला पाहते रे’ मालिका अल्पावधितच छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ठरली. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सुरु झालेली ही मालिका सातत्याने टीआरपी रेटिंग्जमध्ये वरच्या क्रमांकावर राहिलीये. ही मालिका बंद होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यावर सुबोधनं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘ज्या मालिकेने मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला. झी मराठी आणि आमच्या निर्मात्यांनी पुन्हा तुमच्या समोर यायची संधी दिली ती मालिका तुला पाहते रे मालिका मी सोडत नाहीये किंवा ती मालिका अकाली बंद ही होत नाहीये.’ असं सुबोधनं ट्विट करत म्हटलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी मालिका ही सुरूच राहणार असून ही मालिका बंद होणार ही केवळ अफवा असल्याचं सुबोधनं स्पष्ट केलं आहे.

‘२०१९ या वर्षात मी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे. मला काहीही झालं नाही, काळजी करू नका. पण तरीसुद्धा खूप काही गोष्टी डोक्यात आहेत. गेल्या १७-१८ वर्षांपासून मी खूप काम करतोय. त्यातून आनंद मिळतोच आहे पण कधीकधी खूप दमायला होतं, थकायला होतं. झोप पूर्ण होत नाही. खाण्याच्या वेळा बिघडतात आणि त्याचा परिणाम कुठेतरी कामावर होतो. मला असं वाटतं की आता या धावणाऱ्या घो़ड्याला थोडं लगाम लावलं पाहिजे. यावर्षी त्या पदधतीने काम करायचं ठरवलंय. खूप काम यावर्षी करणार नाहीये. थोडं पण चांगलं आणि सकस काम करायचं ठरवलंय. अर्थातच ‘तुला पाहते रे’ हा मालिका काही महिने चालू राहील. ती निरोप घेईपर्यंत तरी दुसरं कुठलं काम हाती घेतलं नाहीये,’ असं सुबोध एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

तेव्हापासून ही मालिका बंद होणार किंवा सुबोध प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चा होत्या. मात्र सुबोधनं प्रेक्षकांची लाडकी मालिका सुरूच राहणार असं सांगत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. २००९ मध्ये ‘कुलवधू’ ही मालिका केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी सुबोध ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की टीआरपी रेटींग्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून पहिल्या पाच लोकप्रिय मालिकेच्या यादीत तिचा समावेश आहे.