बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींची कारकीर्द दीर्घकाळ का टिकत नाही या प्रश्नावर अभिनेता अक्षय कुमारने त्याचे मत मांडले आहे. ‘चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना टाइम बॉम्बसारखे वागवले जाते आणि हे पूर्णपणे अयोग्य आहे,’ असे त्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

‘अभिनेत्रींची कारकीर्द अनेकदा फार मर्यादित असते. ती विशिष्ट कालावधीपुरती मर्यादित असते. मला हे अतिशय चुकीचे वाटते. मात्र काही अभिनेत्रींनी १० वर्षांपेक्षा जास्त काळ रुपेरी पडदा गाजवला. त्यांनी ती चौकट मोडली. त्यांच्याविषयी मला खूप आदर वाटतो’, असे तो म्हणाला.
आरोग्य आणि फिटनेसबाबत ‘खिलाडी कुमार’ किती सजग असतो, हे सर्वांनाच माहित आहे. आताच्या तरुण कलाकारांसाठी फिटनेसची संकल्पना कशाप्रकारे बदलली आहे, यावरही त्याने भाष्य केले. ‘फिटनेससंदर्भात मी अत्यंत काटेकोरपणे सर्व गोष्टी पाळतो आणि याचा मला अभिमान आहे. मात्र, याबाबत तरुण कलाकारांची संकल्पना वेगळीच आहे. बॉलिवूडमध्ये जेव्हा मी पदार्पण केले, त्यावेळी ‘सिक्स पॅक’ म्हणजे काय हे कोणालाच माहित नव्हते. आता त्याचीच सर्वांत जास्त क्रेझ पाहायला मिळते,’ असे मत त्याने मांडले.

वाचा : कपिल शर्मा लवकरच विवाहबंधनात अडकणार?

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर मल्लिका दुआवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे चर्चेत आहे. मात्र, या वादावर प्रतिक्रिया देणे त्याने टाळले.