‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विकी कौशल तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या चित्रपटानंतर त्याला बरेच ऑफर्स येऊ लागले. ‘सरदार उधम सिंग’ यांच्या बायोपिकमध्ये तो मुख्य भूमिका साकारणार असून करण जोहरच्या ‘तख्त’मध्येही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. विकीच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्याचे खासगी आयुष्यही नेहमी चर्चेत राहिले आहे. हरलीन सेठीशी ब्रेकअपनंतर त्याचं नाव कतरिना कैफशी जोडलं गेलं. या चर्चांवर अखेर विकीने मौन सोडलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अफेअरच्या चर्चांवर, बातम्यांवर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असते याबद्दल सांगितले. ”मी एकदा सकाळी उठलो आणि वृत्तपत्रांमध्ये माझ्या लिंक-अपची बातमी होती. माझे आई-वडिल बसले होते आणि मी ते वृत्तपत्र घेऊन कधी वाचणार याची ते वाट पाहात होते. ज्याक्षणी मी ते वृत्तपत्र हातात घेतलं आणि त्यांच्याकडे वळलो तेव्हा ते जोरजोरात हसत होते. तेव्हा वडिल म्हणाले, ज्या गतीने तू पुढे जात आहेस, त्याची किमान माहिती तरी आम्हाला दे. मी त्यांना म्हटलं की मलासुद्धा याबद्दल काहीच माहित नाही,” असं तो म्हणाला.

या मुलाखतीत त्याने कतरिनाशी अफेअरच्या चर्चांवरही मौन सोडलं. ”कतरिना आणि माझ्याबद्दलच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून आहेत आणि त्यानंतर तिच्या जागी आणखी एका मुलीचं नाव असेल,” असं त्याने सांगितलं. बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ विकीने लग्नाविषयीही मत व्यक्त केलं. सध्या करिअरवर लक्ष केंद्रीत करणार असून लग्न जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल, असं तो म्हणाला.

विकीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘भूत’ या थरारपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे तीन भाग असून पहिल्या भागात विकीच मुख्य भूमिका आहे. एका जहाजावर घडणाऱ्या अनपेक्षित घटनांवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.