गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. हे दोघं इटलीमध्ये एका शाही समारंभात विवाह करणार असल्याचे म्हटले जात आहे. दोघांच्या घरातले आणि जवळचे मित्र- मैत्रिणी लग्नासाठी इटलीला रवाना झाले आहेत. या दोघांच्या लग्नाबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असली तरी ज्योतिषांनी मात्र एक वेगळीच भविष्यवाणी केली आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, या लग्नामुळे विराट आणि अनुष्का यांच्या आयुष्यात आनंदच येईल. पण दोघंही आपले खासगी आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखू नाही शकले तर दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात. 'टाइम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ज्योतिष मालव भट्ट यांनी सांगितले की, दोघांमध्ये भावनिक मतभेदांची शक्यता आहे. या मतभेदांमुळेच मानसिक अशांती राहू शकते. त्यामुळेच येणारी दोन वर्षे दोघांसाठीही फार महत्त्वपूर्ण आहेत. विरुष्काचे लग्न नक्की कोणत्या तारखेला होणार याची कोणतीही अधिकृत माहिती आली नसली तरी, हे दोघं आज विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. ८ डिसेंबरला दोघांचेही मित्र- परिवार इटलीला जाण्यासाठी निघाले होते. अनुष्का आणि तिचा मित्र- परिवार मुंबईहून इटलीला रवाना झाले तर विराटने त्याच दिवशी दिल्लीहून इटलीसाठी विमान पकडले. सध्या त्यांचे लग्न ज्या व्हिलामध्ये होणार आहे तिथून नाच- गाण्याचे आवाज ऐकू येत असल्याचे म्हटले जात आहे. या लग्नाला फक्त जवळच्या मित्र- परिवारालाच आमंत्रण देण्यात आले आहे. २१ डिसेंबरला मुंबईमध्ये ते रिसेप्शन देणार असल्याचे सांगितले जात आहे.