अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. पण, संजूबाबा तुरुंगातून बाहेर आल्यापासून या दोन्ही अभिनेत्यांच्या मैत्रीत ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचं चित्र आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून बाहेर आलेल्या संजयची अनेक कलाकारांनी भेट घेतली. तरी, जवळचा मित्र असलेला सलमान मात्र त्याच्या भेटीला गेला नव्हता. या दोघांच्या मैत्रीत आता दरी निर्माण झाली असून, ते एकमेकांच्या विरोधात असल्याचे काही वृत्तांमध्ये आले होते. दरम्यान, मुकेश अंबानी यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीवेळी सलमानने दोन पावले पुढे टाकत संजयला मिठी मारली होती. यावरून बॉलिवूडमधील या ‘भाईं’मध्ये अजूनही मैत्री असल्याचे दिसते.

वाचा : बिकिनीतील दृश्यावेळी माझ्यावर जॅकलिनचं दडपण होतं – तापसी पन्नू

सलमान आणि संजयने काही दिवसांपूर्वीच पहाटेपर्यंत एकत्र वेळ घालवल्याचे वृत्त ‘डीएनए’ने दिले आहे. ‘या दोघांमधील शत्रूत्व या केवळ अफवा आहेत. ‘भूमी’ प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय दत्त सलमानच्या घरी गेला होता. एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलेल्या या अभिनेत्यांनी पहाटे ४ पर्यंत एकत्र वेळ घालवला. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोचलेपणा नाही. केवळ ते पार्टीत किंवा कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसत नाही याचा अर्थ त्यांच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा आला असा होत नाही,’ असे ‘डीएनए’च्या वृत्तात म्हटलंय.

वाचा : निर्मितीसंस्थेला ‘घटिया’ म्हणत अभिनेत्रीचा मालिकेतून काढता पाय

दरम्यान, या दोघांच्याही भेटीबद्दल इतर कोणालाच काही माहिती मिळालेली नाही. नेहमीच सेलिब्रिटींच्या मागावर असणाऱ्या फोटोग्राफर्सनाही त्यांच्या या सिक्रेट भेटीचा पत्ता लागला नाही.