देशातला सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा विनोदवीर कपिल शर्माचा आज वाढदिवस आहे. कोणताही आधार नसताना केवळ स्वकर्तृत्वावर कपिलने कॉमेडी विश्वात आपलं स्थान निर्माण केलं. आज लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला कपिल शर्मा हे नाव माहित आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही त्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र हा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिलने या वाटेत बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कपिलचे वडील पोलीस हवालदार होते. २००४ मध्ये त्यांचं कॅन्सरने निधन झालं. त्यांच्या उपचारासाठी पुरेसा पैसा कपिलच्या कुटुंबियांकडे नव्हता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कपिलच्या खांद्यांवर होती. या परिस्थितीमुळे दहावीत असताना कपिलला एका टेलिफोन बूथमध्ये काम करावं लागलं होतं. अधिकची कमाई करण्यासाठी तो जगरातामध्ये गायनासाठीही जात होता.
महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांमध्ये कपिलचा आवर्जून सहभाग असायचा. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये भाग घेण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. अमृतसरमध्ये झालेल्या ऑडिशनमध्ये त्याची निवड झाली नाही. तेव्हा हार न मानता तो दिल्लीतल्या ऑडिशनसाठी गेला. तिथे निवड झाल्यानंतर तो मुंबईत आला आणि २००७ मध्ये ही स्पर्धा जिंकत कॉमेडीचा बादशहा झाला.

Baaghi 2 box office collection day 3: ‘पद्मावत’ला टक्कर देतोय ‘बागी २’

११ वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या कपिलने ‘कॉमेडी सर्कस’चे सहा पर्व जिंकले. या विजयानंतर तो कॉमेडी किंग म्हणून ओळखू लागला. २०१३ मध्ये त्याने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो सुरू केला. या शोच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम केलं. ‘फिल्मफेअर’, ‘स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्स’ यांसारख्या मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यांच्या सूत्रसंचालनाची धूरा त्याने सांभाळली.

वाचा : कतरिनाच्या बहिणीला सलमान म्हणणार ‘ओss ओss जाने जाना’

काही काळ ब्रेक घेतल्यानंतर कपिलने ‘फॅमिली टाईम विथ कपिल’ या शोसह पुनरागमन केलं आहे. असा हा कॉमेडीचा किंग प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवत राहिला आहे.