‘माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं’ या खेळाच्या आठवणी अनेकांच्या स्मृतिरंजनात असतील. मात्र कालौघात हा खेळ हरवलाय आणि ते पत्रसुद्धा. एक छोटा कागदाचा कपटा, पण पत्रातील दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये किती तरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असायच्या. हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात चिरंतन दरवळतो. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याही मनात डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या पत्राचा दरवळ आणि त्याची आठवण आजही रुंजी घालते आहे.

हेही वाचा >>> ‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर! ‘कलर्स मराठी’च्या २ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष

‘हसवाफसवी’ हे नाटक पाहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं सांगताना, नाट्यरसिकांसाठी दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे. त्यासही नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरदार सुरू आहेत. यासाठी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांची त्यांना साथ लाभली आहे. आणि आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना बदामराजा प्रॉडक्शन्स निर्मित ‘पत्रा पत्री’ हा रंगाविष्कार मंचावर येणं, नाट्यरसिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळणं हे निश्चितच उत्सुकता वाढवणारं आहे. माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत.

दिलीप प्रभावळकर याविषयी म्हणाले, ‘पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रा पत्री’चा प्रयोग करण्याचं ठरवलं. प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचं लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत.’