अजय देवगण आणि तब्बू या दोन ताकदीच्या कलाकारांची थोड्या जुन्या वळणाची अगदी हीर-रांझा किंवा रोमिओ-ज्युलिएट स्टाइलची… पण थोडी प्रगल्भ प्रेमकथा पाहायला मिळावी हीच खरं तर ‘औरो में कहाँ दम था’ या चित्रपटाविषयी उत्कंठा वाढवणारी मुख्य गोष्ट होती. त्यातही चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन नीरज पांडेसारख्या वेगळं काही करू पाहणाऱ्या यशस्वी चित्रपटकर्मीचं असल्याने अपेक्षांचा काटा अगदी उंचावर जाऊन बसलेला असतो. अपेक्षांची तागडी अगदीच खाली बसत नसली तरी काहीशा जुन्याच पद्धतीच्या मसालापटांना शोभेल अशी सोपी मांडणी केली असल्याने ही प्रेमकथा तितकी ‘दम’दार वाटत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णा आणि वसुधा या प्रेमीयुगुलाभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. एकमेकांवर अतोनात प्रेम करणारे हे दोघंही आजच्या क्षणाला एकमेकांपासून खूप दूर आहेत. दोन जणांची हत्या केल्याप्रकरणी गेली २२ वर्षे कृष्णा तुरुंगात शिक्षा भोगतो आहे. त्याची शिक्षा कमी झाली असून तो तुरुंगाबाहेर येणार आहे. तर वसुधाचं लग्न झालं आहे, पण अजूनही कृष्णाचं प्रेम सावलीसारखं तिच्याबरोबर आहे. तिच्या मनात आहे.

२२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की त्यांच्या प्रेमकथेत मिठाचा खडा पडला. एकमेकांवरचं त्यांचं प्रेम आजही टिकून आहे, पण खरोखरच भूतकाळ मागे टाकून हे दोघंही पुन्हा एकत्र येतात का? या सगळ्याचा उलगडा करणारी ही प्रेमकथा आहे.

२००१ ते २०२३-२४ असा कालावधी या चित्रपटात घेण्यात आला आहे, त्यामुळे खरं तर कथा खूप जुन्या काळातली आहे असं नाही. तरीही या चित्रपटात कृष्णा आणि वसुधा यांची तरुणपणातील प्रेमकथा दाखवण्यासाठी उभारलेल्या चाळीच्या सेटपासून ते मुळातच त्यांची ताटातूट होण्याचं कारण आणि त्यांचं एकत्र येणं हे सगळंच साचेबद्ध पद्धतीचं, परिचित वाटेनंच जाणारं आहे. केवळ मांडणी करताना दिग्दर्शक नीरज पांडे यांनी त्यातलं गूढ वाढवत नेण्याचा हुशारीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे गोष्टीत तेच तेच असलं तरी आपण पुढे काय होतं आहे हे पाहात राहतो.

प्रेमकथा एकच असली तरी ऐन तारुण्यात प्रेमात पडलेल्या चाळीतील कृष्णा आणि वसुधा दोघांचं हळूहळू फुलत जाणारं प्रेम आणि त्या दोघांची आजच्या काळातील वास्तव अशा दोन गोष्टी समांतर पातळीवर आपण पाहात असतो. तरुणपणातील भूमिका शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांनी केल्या आहेत. शंतनूचा हसरा चेहरा, एकूणच लाघवी व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या वाट्याला आलेली समजूतदार, मनमिळाऊ कृष्णाची व्यक्तिरेखा हे दोन्ही इतकं छान जमून आलं आहे की त्याचा पडद्यावरचा वावर खूप आनंददायी वाटतो. मात्र हाच किडकिडीत व्यक्तिमत्त्वाचा कृष्णा प्रेमासाठी साऱ्या जगासमोर त्वेषाने उभा राहणारा प्रेमी म्हणून बदलत जातो ते सहजी पचवणं अवघड आहे, त्यात भरीस भर म्हणून तुरुंगात त्याची प्रगल्भ आवृत्ती म्हणून थेट थंड डोक्याने वावरणारा अजय देवगण या दोन्हींचा मेळ काही केल्या लागत नाही. त्या तुलनेत सई मांजरेकरने साकारलेली निरागस, खंबीर, हुशार वसुधा आणि पुढे त्याच भूमिकेत तब्बू हे दोन्ही किमान तर्काच्या कसोटीवर तरी जमवून घेता येतात.

हेही वाचा >>>“जान्हवी तुला लाज वाटत नाही का?”, वर्षा उसगांवकरांना ‘ती’ वागणूक दिल्यामुळे प्रेक्षक संतापले! म्हणाले, “साइड रोल करणारी…”

अजय देवगण आणि तब्बू या जोडीमधला प्रणय, त्यांच्यातील प्रगल्भ प्रेम पाहणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरू शकलं असतं, पण त्याला फारसा वाव मिळालेला नाही. भावनिक नात्यांतील गुंतागुंत सहजअभिनयातून पेलण्याची ताकद या दोघांकडेही आहे, त्याचा फार उपयोग दिग्दर्शकाने करून घेतलेला नाही.

कृष्णा-वसुधा यांची प्रेमकथा फुलण्याआधीच खुडण्यामागचं दुर्दैवी घटना नाट्य हा एक भाग सोडला तरी त्यानंतर जेव्हा हे दोघं एकत्र येतात, तेव्हा आणखी एक तिसरा धागा वसुधाचा पती अभिजीतच्या निमित्ताने यात जोडला जातो. ही भूमिका अभिनेता जिमी शेरगिल याने केली आहे. प्रेमातली गुंतागुंत, एका विचित्र वळणावर तिघांचंही एकमेकांसमोर येणं, कुठलं नातं स्वीकारावं-कुठलं सोडावं याबाबतीतली तगमग, अशा कैक भावछटा खुलवण्याची संधी यात होती. पण ती घेण्यापेक्षा दिग्दर्शकाने सोप्या पद्धतीने कथा सुफळ संपूर्ण केली आहे.

नीरज पांडे यांचं प्रभावी दिग्दर्शन असूनही जुन्या परिचित वळणाने जाणारी प्रेमकथा तितकी ‘दम’दार ठरत नाही.

औरो में कहाँ दम था’

दिग्दर्शक – नीरज पांडे

कलाकार – अजय देवगण, तब्बू, जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी, सई मांजरेकर, सयाजी शिंदे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn and tabu love story auro mein kahan dum tha amy