अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी चालू आहे. १२ जुलैला हे जोडपं मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळेल. दरम्यान, अंबानींच्या घरची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिकेबरोबर सर्व पाहुण्यांना एक खास भेटवस्तू देण्यात आली आहे. ही भेटवस्तू नेमकी काय आहे पाहूयात…

अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. परंतु, तुम्हाला माहितीये का या लग्नपत्रिकेच्या बॉक्सबरोबर एक खास शाल सर्व पाहुण्यांना गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे. काश्मीरमधील कारागीरांनी हातांनी विणलेली ही ‘दोरुखा पश्मिना शाल’ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ही शाल भेटवस्तू म्हणून देण्यामागे आपला सांस्कृतिक वारसा जपणं, भारतातील कारागीरांची कलाकुसर सर्वत्र पोहोचणं आणि आर्थिक महत्त्व हा उद्देश आहे. काश्मीरमध्ये श्रीनगरच्या गाझी दूरी आलमगरी बाजारातील बेग कुटुंबातील गुलाम मुहम्मद बेग यांनी या ‘दोरूखा पश्मिना शाल’ कशी बनवली जाते, याचं महत्त्व काय आहे हे ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सांगितलं.

हेही वाचा : पदरात दोन मुलं अन् पस्तिशीत झाली विधवा; अभिनेत्री शांतीप्रियाने सांगितला पती सिद्धार्थ रेच्या निधनानंतरचा कठीण काळ

“दोरुखा शालींवर नाजूक असं भरतकाम केलेलं असतं. ज्यामध्ये प्रति चौरस सेंटिमीटर एकूण ५०० टाके असतात. या शालीवरचं विणकाम हे खूपच गुंतागुंतीचं असतं कारण, या शालीवरची दोन्ही बाजूची डिझाइन तुम्हाला सारखीच दिसेल. त्यामुळे अशाप्रकारच्या दोरूखा पश्मिना शाल तयार करताना कारागीराचं कौशल्य पणाला लागतंच याशिवाय या कामासाठी प्रचंड संयम आणि वेळ द्यावा लागतो. अनेकदा सुंदर अशा ‘दोरूखा जमावर शाल’ बनवण्यासाठी अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या शालींवर कोणत्या पद्धतीचं वर्क केलंय यावर त्यांची किंमत आधारलेली असते. साधारणत: हलक्या प्रतिचं विणकाम केलेली शाल तुम्हाला १० ते १२ हजारांपर्यंत मिळते तर, चांगल्या प्रतिचं विणकाम केलेली शाल निश्चितच यापेक्षा महाग असते” असं इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना बेग यांनी सांगितलं.

पश्मिना लोकर ही लडाखच्या पहाडी प्रदेशात आढळणाऱ्या चांगथंगी बकऱ्यांपासून मिळते. ही लोकर अत्यंत मऊ आणि तिच्या ऊबदारपणासाठी प्रसिद्ध आहे. यापासून ‘दोरुखा पश्मिना शाल’ बनवली जाते. ही शाल थंडीच्या वातावरणात जास्त खूप ऊब देते.

हेही वाचा : ना सासूबाई, ना आई; शिवानी रांगोळे मृणाल कुलकर्णींना म्हणते ताई! दोघींचं नातं पाहून नेटकरी म्हणाले…

बेग पुढे म्हणाले, “पूर्वी ‘कानी’ या पद्धतीचा वापर करून या शाल विणल्या जायच्या. परंतु, आता ही पद्धत जवळजवळ नाहीशी झाली आहे. ‘दोरूखा पश्मिना शाल’ बनवण्यासाठी कारागीराचं संपूर्ण कौशल्य पणाला लागतं. यासाठी कारागीर अनुभवी असावा. याशिवाय फूल किंवा इतर कोणतंही डिझाइन विणण्यासाठी शालीवर कुठे आणि किती टाके लागतील हे सुद्धा त्या कारागीराला आधीच माहिती असणं आवश्यक असतं. या शाल काश्मीरच्या कारागीरांच्या कौशल्याचं प्रतिनिधीत्व करतात. पश्मिना शाल म्हणजे काश्मीरच्या परंपरा आणि आधुनिकतेला जोडणारा दुवा आहे.”

लग्नपत्रिकेच्या बॉक्सबरोबर अंबानींनी त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना काश्मीरच्या कारागीरांनी बनवलेली ही खास ‘दोरुखा पश्मिना शाल’ भेट म्हणून दिली आहे. ही शाल एका बाजूला निळी तर, दुसऱ्या बाजूला जांभळ्या रंगाची आहे. यावर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलं आहे.