बॉलीवूडमध्ये लग्न होऊन काही महिन्यातच किंवा वर्षातच घटस्पोट होणे ही काही नवी बाब नाही. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कल्की कोचलीन लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतर आता वेगळे होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, हे दोघेही घटस्पोट घेणार नसून, केवळ काही काळाकरिता वेगळे होणार आहेत, असे अनुरागने म्हटले आहे.
या दोघांचे लग्न कठीण वेळेला सामोरे जात असून, त्यांनी याबाबत अधिक काही बोलणे टाळले आहे. अनुराग म्हणाला की, मी आणि कल्की वेगळं होत आहोत. आम्ही घटस्पोट घेणार नाही. पण, आम्हाला एकमेकांना थोडा वेळ द्यायचा आहे. माध्यमांनी आमच्या निर्णयाचा आदर करावा.
अनुराग कश्यपने ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’, ‘गॅन्गस ऑफ वासेपूर’ आणि ‘देव डी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘देव डी’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी प्रेमात पडलेले हे प्रेमीयुगुल २०११ साली विवाहबंधनात अडकले. अनुराग कश्यपचे हे दुसरे लग्न असून, त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगीदेखील आहे.