अभिनेत्री श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी रोजी दुबईत अकस्मात निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. त्यावेळी श्रीदेवी यांचा सावत्र मुलगा अर्जुन कपूर भारतात होता. अर्जुन आणि श्रीदेवी यांच्यामध्ये तसं फारसं सलोख्याचं नातं नव्हतं. पण त्यावेळी स्वत:ला सावरत कशाप्रकारे कुटुंबीयांना साथ दिली हे अर्जुनने सांगितलं. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अर्जुनने त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं.

‘क्षणभरात सर्व गोष्टी बदलतात. तो क्षण मी अनुभवला. माझ्या शत्रूंवरही कधी अशी वेळ येऊ नये. बहीण अन्शुला आणि मी शक्य तेवढी मदत केली. त्यावेळी आम्हालाही जवळच्या व्यक्तींची गरज होती. पण आमच्यासोबत कोणीच नव्हतं आणि याचा अर्थ असा नाही की जान्हवी- खुशीसोबतही कोणीच नसावं. माझी आई हयात असती तर तिनेही सर्वांत आधी त्यांच्या मदतीला धावून जाण्यास सांगितलं असतं. मनात कोणतेही शल्य न ठेवता त्यांची साथ दे असंच तिने मला सांगितलं असतं,’ असं अर्जुनने सांगितलं.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच अर्जुनने कोणताही निर्णय घेण्याआधी सर्वांत आधी अन्शुलाला विचारल्याचं सांगितलं. ‘अन्शुलाला फार हिंमत करून मी विचारलं की काय करावं? त्यावेळी पहाटेचे २ वाजले होते आणि सर्वांत आधी तिने हाच प्रश्न विचारला की खुशी-जान्हवी कुठे आहेत?,’ असं तो म्हणाला.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने जान्हवी आणि खुशी या दोघी बहिणींची आणि वडील बोनी कपूर यांचीही खूप काळजी घेतली. वडिलांसोबत दुबईत जाऊन तिथल्या सर्व कायदेशीर बाबी त्याने पूर्ण केल्या आणि इथे आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला.