करोनामुळे देशभरात लॉकडाउन असल्याने लोक घरात अडकले आहेत. चित्रपट, मालिका यांचं दिग्दर्शन रखडलं असल्याने अनेक वाहिन्यांवर जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या जात आहेत. त्यात दूरदर्शनने पुन्हा एकदा ‘रामायण’ प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना जुन्या दिवसांची आठवण झाली. अरुण गोविल यांनी रामायणात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली होती. आज ३३ वर्षानंतरही लोकांच्या मनात ही भूमिका तितकीच ताजी आहे. अरुण गोविल हे मूळचे मेरठ, उत्तरप्रदेशचे. हिंदी, भोजपुरी, तेलुगू, ओडिया अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. अरुण गोविल यांनी १९७७ मध्ये आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. ताराचंद बडजात्या यांच्या ‘पहेली’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यांनी ‘सावन को आने दो’, ‘सांच के आंच नही’ असे काही हिट चित्रपट दिले. अरुण गोविल यांच्या पत्नी श्रीलेखा गोविल यासुद्धा अभिनेत्री आहेत.
श्रीलेखा यांनी ‘हिम्मतवार’, ‘छोटासा घर’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. श्रीलेखा यांनी मराठीतही काम केलं. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आई पाहिजे’ चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत रमेश भाटकर, आशा काळे, सदाशिव अमरापूरकर, नयनतारा, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
अरुण गोविल व श्रीलेखा यांना अमल व सोनिका अशी दोन अपत्ये आहेत. आईवडिलांप्रमाणे अभिनयक्षेत्रात न येता ही दोन्ही मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.