बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून शनिवार, २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. आज आर्यनची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्याला आज मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. मात्र यावर एनसीबीने ११ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी मागितली होती. मात्र, सुनावणीअखेर न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणात आणखी तपास गरजेचा आहे. चौकशीच्या आधारावर, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोठडी आवश्यक आहे, हा वकिलांचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरला.

या ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांची कोठडीही संपत आहे. तिघांनाही दुपारी न्यायालयात हजर केले गेले होते. अरबाज मर्चंटच्या वकिलाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यासोबतच वकिलांनी दुसरी याचिका दाखल केली असून त्यात एनसीबीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्यनचे वकील न्यायालयात काय म्हणाले?

आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयात नाराजी व्यक्त केली. “आर्यनच्या विधानानुसार त्याला अटक करण्यात आली आणि गेटवरुन ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिकाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार नाही. या प्रकरणात पहिल्या दिवशी, मी रिमांडसाठी तत्काळ सहमत झालो होतो. विचार केला की तपासात काही विकास होईल. मात्र काही अटके व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी काही घडले नाही. काल, जेव्हा अर्चित  कुमारला झाली तेव्हा त्यांनी मर्चंड आणि खान यांचा याच्याशी संबंध आहे की हे तपासायला पाहीजे होते. मात्र असे झाले नाही.”, असे मानशिंदे आर्यनची बाजू मांडतांना न्यायालयात म्हणाले.

दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते की, आर्यन कोडवर्डमध्ये चॅट करत असे आणि हे डीकोड करण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक आहे. त्याच्या अनेक चॅटमधून त्याचे डीलर्सशी संबंध असल्याचे उघड होते. तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार झाल्याचे देखील स्पष्ट होत आहे. आरोपींनी ड्रग्स पॅडलरशी व्यवहार करण्यासाठी कोडवर्डचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत आरोपींना रिमांडमध्ये समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे.