अलीकडच्या काळात विनोद हा वादाचा मुद्दा झाला आहे. एखाद्या विनोदाने कुणाच्या भावना कधी आणि कशाप्रकारे दुखावल्या जातील याचा काही अंदाज नाही. मात्र एक काळ असा होता जेव्हा कलाकारांच्या विनोदाने रसिक मंडळी फक्त भरभरून हसायची. या काळात दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ (Ashok Saraf), सचिन पिळगांवकर अशा अनेक कलाकारांनी आपल्या निखळ विनोद निर्मितीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडलं होतं.

पण अलीकडे विनोदनिर्मितीने अनेकांच्या भावना दुखावल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत अशोक सराफांनी आताच्या आणि याआधीच्या काळातील कॉमेडीबद्दल भाष्य केलं आहे. अशोक सराफ व वंदना गुप्ते यांचा ‘अशी ही जमवाजमवी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचनिमित्त अशोक सराफांनी ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी आधीच्या आणि आताच्या कॉमेडीमधील फरकाबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं.

याबद्दल अशोक सराफ म्हणाले की, “आम्ही जी कॉमेडी करतो ती लोकांना पटेल का? या विचारानेच करतो. निदान मी तरी करतो. हे लोकांना पटणार आहे किंवा नाही याचा विचार करावाच लागतो. कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आज मी जे करत आहे ते काही लोकांना आवडत नसेल सुद्धा किंवा काही लोक करतात ते मलासुद्धा आवडणार नाही. असं होऊ शकतं. त्यामुळे ते एकमेकांना आवडू शकेल. हा अंदाजच असतो”.

यापुढे ते म्हणाले, “हा अंदाज खरा ठरवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याकडून केला जातो आणि तो करायलाही पाहिजेच असं मला वाटतं. आम्ही बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. भूमिका आणि पात्राचा विचार अधिक केला जातो. तुमची भूमिका किंवा तुमचं पात्र काय म्हणत आहे? हे जास्त महत्त्वाचं असतं. त्या पात्राला अनुसरून तुमची कॉमेडी असली पाहिजे. एखाद्या गंभीर भूमिकेसाठी काहीतरी वेगळीच कॉमेडी असेल तर त्याला काही अर्थ नसतो.”

यापुढे अशोक सराफांनी असं म्हटलं की, “आपल्याबरोबर कोण आहे हेसुद्धा विचारात घेतलं पाहिजे. त्याला योग्य वाटेल अशी कॉमेडी झाली पाहिजे. हे फार विचारपूर्वक केलं जातं. कॉमेडी इतकी सोपी नाही. लोकांना वाटतं की काय कॉमेडी सहज केली जाते. पण तसं नाही. लोकांना हसवणं फार कठीण आहे आणि सतत हसवणं हेही कठीण आहे. तसंच कॉमेडीचा प्रभाव शेवटपर्यंत ठेवणं हे त्याहून कठीण आहे. त्यामुळे कॉमेडी विचाराने आणि लोकांना विचारात घेऊनच केली पाहिजे.”

यानंतर त्यांनी असं म्हटलं की, “मी केलेली कॉमेडी ही सर्व वयोगटातील लोकांना आवडणारी आहे. त्यामुळेच माझे लहानांपासून मोठयांपर्यंत सगळेच चाहते आहेत. मी घाणेरडं काही बोलत नाही की, जेणेकरून लोकांना वाटेल हे काय आहे. अशी कॉमेडी पसंत नाही आणि मी ते करतच नाही. असं काही असेल तर आम्ही ते काढूनच टाकतो. स्वच्छ, सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे.”