Atul Parchure : अतुल परचुरेंचं निधन, म्हणजे काय झालं? तर सिने-नाट्यसृष्टीतला एक हरहुन्नरी आणि दिलखुलास कलावंत गेला. त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षीच एक्झिट घेतली. त्यांचंं असं जाणं हे मनाला चटका लावून जाणारं आहे यात काही शंकाच नाही. अतुल परचुरे ग्रेट होतेच काही शंकाच नाही. ‘नातीगोती’मधलं त्याचं काम असो किंवा पु.लंच्या व्यक्ती आणि वल्लीमधली पु.लंची भूमिका असो सगळीच कामं त्याने उत्तम साकारली. प्रेक्षक म्हणून तो पुलंच्या भूमिकेत मला खूपच आवडला. पु.लं.बाबत अतुल परचुरेंनी ( Atul Parchure ) सांगितलेली एक आठवण खूप खास होती.

अतुल परचुरेंनी पुलंबाबत काय सांगितलं होतं?

अतुल परचुरे ( Atul Parchure ) म्हणतात, “पुलंनी माझं नातीगोती हे नाटक पाहिलं होतं. ते मला ओळखत होती. व्यक्ती आणि वल्लीच्या निमित्ताने त्यांच्या माझ्या भेटी झाल्या, पण हक्काने गप्पा मारायला जाऊन त्यांना त्रास द्यावा हे मला योग्य वाटलं नाही. तेव्हा आजारपणाचा त्रास त्यांना (पु.ल. देशपांडे) सुरु झाला होता. पु.लं एकदा माझं नाटक बघायला आले तेव्हा त्यांनी मला भेटून सांगितलं होतं तुझं काम पाहताना सतीशची (सतीश दुभाषी) आठवण येते. सतीश दुभाषी आणि पुलंच्या चेहऱ्यात साम्य होतं. व्यक्ती आणि वल्लीचा प्रयोग पाहायला ते आले होते. नाटक संपल्यावर त्यांनी मला पेटीवर ‘कृष्ण मुरारी’ वाजवून दाखवलं होतं. त्यांनी माझं नाटक पाहणं, पेटीवर गाणं वाजवून दाखवणं हा मी माझा गौरव समजतो.”

Atul Parchure Death : अभिनेता अतुल परचुरेंचं निधन, पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड

पुलंचं मराठी समजणारा प्रेक्षक आज नाही

पु.लं.चं मराठी समजणारा प्रेक्षक आज नाही. पुलंची भाषा अलंकारिक नाही पण त्यांचा विनोद समजण्यासाठी मराठी भाषेची बलस्थानं ठाऊक असली पाहिजेत. मला प्रामाणिकपणे वाटतं, इंग्रजी माध्यमांत शिकलेली मुलं जर त्यांना आपण नाटकांपर्यंत आणू शकलो तर त्यांनाही पुलंची नाटकं नक्की आवडतील. अशी आठवण अतुल परचुरेंनी ( Atul Parchure ) लिहिली होती.

व्यक्ती आणि वल्लीची ती खास आठवण

पुढे अतुल परचुरे ( Atul Parchure ) याच लेखात म्हणतात, “झी टीव्हीसाठी आम्ही व्यक्ती आणि वल्ली मालिकेच्या रुपात केलं. तिथे आम्हाला नंदा प्रधान, भैय्या नागपूरकर या व्यक्ती आणि वल्लीही घेता आल्या. नंदा प्रधान ही भूमिका सचिन खेडेकरने केली होती. व्यक्ती आणि वल्ली नाटक आणि मालिकेचा दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी होता. त्याला नाटकाची उत्तम जाण आहे. व्यक्ती आणि वल्ली हे नाटक रेव्हू फॉर्ममध्ये आहे. त्याला निवेदनाची जोड असली पाहिजे हे चंद्रकांत कुलकर्णीला जाणवलं. चंद्रकांत कुलकर्णी मला म्हणाला तुझ्या खांद्यावर कॅमेरा आहे. तू शूट करुन दाखवायचं. म्हणजेच मला दोन पातळ्यांवर काम करावं लागलं. एक म्हणजे त्यातून बाजूला होऊन नाटकातलं लेखकाचं पात्र होऊन वावरणं हा एक वेगळाच आनंद होता. लोक मला विचारात पाठांतराचा त्रास होत नाही का? कसा होणार? मुळात व्यक्ती आणि वल्ली मला पाठ होतंच. पुलंनी मला काम करायला सांगितलं होतं हा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण होता.” अशी आठवण अतुल परचुरेंनी ‘जीवनज्योत’ या दिवाळी अंकातील लेखात सांगितली होती.

माझ्या आयुष्यातली हायलाईट अशी म्हणता येईल अशी आठवण म्हणजे..

पुढे अतुल परचुरे म्हणतात, “ज्याला हायलाईट म्हणता येईल अशी पुसली न जाणारी आठवण म्हणजे माझं लग्न ठरलं होतं. पहिली पत्रिका गणपतीला ठेवली, दुसरी पुलंना देण्यासाठी पुण्याला गेलो होतो. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना लग्नाला येता येणार नाही हे पण माहीत होतं. त्यांना पत्रिका दिली. त्यांनी मला ‘युवराज’ अशी हाक मारली आणि म्हणाले प्रकृती बरी असली तर मी लग्नाला नक्की येईन आणि आश्चर्य म्हणजे लग्नाच्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांचा फोन आला म्हणाले, मी येऊ शकणार नाही, पण इथूनच सांगतो नांदा सौख्यभरे.” ही आठवणही अतुल परचुरेंनी त्यांच्या लेखात लिहिली आहे.