आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखादी गोष्ट जर मुळाशी जोडलेली नसेल तर ती कशी बहरेल, असे म्हटले जाते. म्हणूनच कदाचित आजच्या वेगवान जीवनशैलीतही आपल्या परंपरा आणि संस्कृती विसरून चालणार नाही याची वेळोवेळी आठवण आपल्या घरातील मोठी माणसे करून देत असतात. या बदलत्या काळामध्ये आकाशाला गवसणी घालण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी आपण विसरून जातो की, आधुनिक पोकळ झगमगाटापेक्षा सुसंस्कृत दीपोत्सवच प्रगल्भ असतो. संस्कृतीला आणि परंपरेला धरून राहणाऱ्या व्यक्तीला वेडं ठरवणाऱ्या या जगात जेव्हा एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नावीन्याची कास असणारा राजवर्धन जेव्हा एकेमकांसमोर येतात तेव्हा काय घडेल ?, याचे उत्तर देणारी ‘भाग्य दिले तू मला’ ही नवी मालिका कलर्स मराठीवर दाखल होत आहे. 

विराट एंटरटेनमेंट निर्मित ही मालिका कलर्स मराठीवर ४ एप्रिलपासून दररोज रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ ‘रत्नमाला’ ही व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत असणार आहेत. गुहागर येथे लहानाची मोठी झालेली कावेरी.. सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आणि त्यांना अविभाज्य भाग मानणाऱ्या कावेरीचे मन कधीच सिमेंट काँक्रीटच्या घरात लागलं नाही. तर, दुसरीकडे, परंपरा आणि संस्कृती यांना जळमटासारखं झटकून पुढे चालणारा, आताच्या भौतिक सुखांपुढे नाती, प्रेम यांना तुच्छ लेखणारा उद्दाम, मग्रूर, आणि मुळांशी न जोडलेला राजवर्धन म्हणजेच रत्नमाला यांचा मुलगा. ज्याचं म्हणणं आहे, मोठं व्हायचं असेल तर जमीन सोडावी लागते. तर मोठय़ा उद्योजिका असलेल्या रत्नमाला यांचा, जमिनीवर राहून देखील आकाशापर्यंत गवसणी घालता येत, यावर ठाम विश्वास आहे.  रत्नमाला, त्यांचा उद्योगाचा डोलारा यशस्वीरीत्या पुढे घेऊन जाण्यासाठी, राजवर्धनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यासारख्याच संस्कृतीला धरून चालणाऱ्या मुलीच्या त्या शोधात आहेत. आणि याचदरम्यान त्यांची आणि कावेरीची भेट होते. आता, रत्नमाला यांच्या पुढाकाराने कसे राजवर्धन आणि कावेरी एकेमकांना भेटणार ? कसा असेल त्यांचा हा प्रवास ? कशी रंगणार कावेरी आणि राजवर्धनची हळुवार प्रेमाची गोड गोष्ट लवकरच कळेल. यानिमित्ताने बोलताना  कलर्स मराठीचे  (वायकॉम १८) व्यवसाय प्रमुख अनिकेत जोशी म्हणाले, ‘‘कलर्स मराठी नव्या वर्षांत प्रेक्षकांसमोर साचेबध्द मालिकांव्यतिरिक्त वेगळय़ा धाटणीच्या, आशयघन कथानक असलेले विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे.  नावीन्यतेबरोबरच प्रत्येक मालिका, मालिकेतील पात्र हे मराठी मनाशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले राहील याची आम्ही जबाबदारी घेऊ. ‘‘भाग्य दिले तू मला’’ ही मालिका या बदलाची सुरुवात आहे’’.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagya dile tu mala new series colors marathi faster lifestyle tradition culture memories ysh