बिग बॉस १५ चा अंतिम सोहळा येत्या ३० जानेवरीला पार पडणार आहे. त्याआधी देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले घरातून बाहेर पडले. त्यानंतर बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यासाठी तेजस्वी प्रकाश, निशांत भट्ट, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, राखी सावंत आणि रश्मी देसाई यांनी आपली जागा निश्चित केली आहे. हे सर्व सदस्य आता विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. या सदस्यांना रोस्ट करण्यासाठी दोन आरजेंनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राखीला तिचा नवरा आणि लग्नाबाबत काही प्रश्न विचारले. त्यांची उत्तरं देताना राखी भावुक झालेली पाहायला मिळाली. यासोबतचं तिनं पती रितेशकडे एक मागणी देखील केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये राखीला तिचा नवरा आणि लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. आरजेनी राखीला विचारलं, ‘नवऱ्याला सर्वांसमोर आणण्यासाठी तू बिग बॉस १५ ची निवड का केली? तू रितेशची कायदेशीर पत्नी आहेस का?’ त्यावर राखी म्हणाली, ‘जेव्हा मी बिग बॉस १४ मध्ये आले होते. त्यावेळी मी विवाहित आहे असं सांगितलं होतं. पण माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. मी त्यावेळी खूप रडले होते. तेव्हा माझ्या पतीनं मला सांगितलं होतं की तो भारतात येऊन लग्नाची घोषणा करण्यासाठी एक रिसेप्शन ठेवणार आहे. तर त्याला मी त्यावेळी थांबवलं होतं. पण अशातच मला बिग बॉसची ऑफर आली. माझ्या कमाईचा प्रश्न होता त्यामुळे मग मी माझ्या पतीची ओळख बिग बॉसमधूनच करून देण्याचा निर्णय घेतला. हा खूपच लोकप्रिय शो आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला.

राखी पुढे म्हणाली, ‘माझ्या आईनं मला व्हिडीओ कॉलवर सांगितलं की, रितेश घरी माझी वाट पाहत आहे. पण मी आता ठरवलं आहे की, जोपर्यंत तो मला लग्नाचं प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत मी त्याच्यासोबत राहणार नाही. त्याने माझ्यावर दया दाखवावी असं माझं अजिबात म्हणणं नाही. जर मी चांगली व्यक्ती आहे असं त्याला वाटत असेल तरच त्यानं हे नातं पुढे न्यावं. मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. एक पत्नी म्हणून मला माझे अधिकार हवे. त्यामुळे त्याने मला लग्नाचं प्रमाणपत्र द्यावं. त्यानंतर मी त्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालवण्यासाठी तयार आहे. जर तो असं करू शकत नसेल तर मी या नात्याचा विचार करू शकत नाही. आम्ही वेगळं झालेलंच चांगलं.’

दरम्यान यावेळी राखी सावंतनं सांगितलं की, तिचं रितेशशी झालेलं लग्न हे कायदेशीर नाहीये. मागच्या एका एपिसोडमध्येही तिनं याचा खुलासा केला होता. ‘रितेशनं राखीशी लग्न होण्याआधीच विवाहित होता. त्याला एक मुलगा देखील आहे. पण रितेशनं त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेतल्यानं त्याचं राखीशी झालेलं लग्न हे कायदेशीर नाही’ असं राखीनं सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 15 rakhi sawant demand husband ritesh to give me the certificate of marriage mrj