सलमान खानने कितीही समजावले, तरी ‘बिग बॉस’चे स्पर्धक काही केल्या ऐकायला तयार नाहीत. घरात भांडण करणे, नियमांचे उल्लंघन करणे, एकमेकांबद्दल वाईट शब्दांचा वापर करणे आणि आक्रमक होणे, असे अनेक प्रकार या वेळच्या ‘बिग बॉस’च्या सत्रात पाहायला मिळत आहेत. खुद्द सलमानसुद्धा यामुळे त्रस्त झाल्याचे चित्र दिसते आणि यामुळेच बिग बॉसचे हे आपले शेवटचे सत्र असल्याचे त्याने सुचित केले. ‘बिग बॉस’च्या घरात नामांकनाच्या चर्चेला सक्त मनाई आहे. स्पर्धकांना याची पूर्ण कल्पना आहे. या महत्त्वाच्या नियमाचे भान न ठेवता एजाझ आणि कुशाल नामांकनावर चर्चा करून एकत्रितपणे व्यूहरचना रचत कोणाला नामाकिंत करायचे, याची योजना बनवतात.

हा सर्व प्रकार असा घडतो – नामांकमाचा दिवस जवळ येत असतांना एजाझला कोणाला नामांकित करावे, हे समजत नाही. या विषयावर तो ‘बिग बॉस’च्या घरातील ‘मच रोमॅंटिक’ जोडी कुशाल आणि गौहरशी चर्चा करतो. गौहर या चर्चेचा भाग न होता, त्या दोघांनासुद्धा असे करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करते. परंतु, कुशाल आणि एजाझ नामांकनावर चर्चा करतात आणि आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्याला नॉमिनेशनला सामोरे जावे लागेल, याची योजना बनवतात.
या सर्व प्रकारामुळे ‘बीग बॉस’ला अतिशय राग येतो. कुशाल आणि एजाझच्या नॉमिनेशनवरील चर्चेचा व्हिडिओ ‘बिग बॉस’ घरातील सर्व मंडळींना दाखवतो. ज्यात संग्राम, तनिषा आणि कामया हे त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे समोर येते. कुशाल आणि एजाझचे हे षडयंत्र पाहून घरातील सर्वजण चकित होतात. गौहरच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडत असताना, त्यांना थांबविण्याचा प्रयत्न तिने न केल्याने घरातील इतर मंडळी तिच्यावर टीकेची झोड उठवतात.

नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ‘बिग बॉस’ घरातील सर्व मंडळींना शिक्षा देण्याचे ठरवतो. ही शिक्षा काय असेल? घरातील अन्य सदस्य या शिक्षेचा भाग व्हायला तयार होतील का? प्रेक्षकांना हे ‘बिग बॉस’च्या सोमवारच्या भागात समजेल.