बॉलिवूडचा काळ बदलला असून, आजकालचे अभिनेते आणि अभिनेत्र्यांना स्वत:ला पहिल्याच चित्रपटतून सिध्द करावे लागत आहेत. मात्र, आमच्या वेळी परिस्थिती खूप भिन्न होती. असे म्हणणे आहे बॉलिवूडचा मेगा स्टार अमिताभ बच्चन यांचे.
‘सात हिंदूस्तानी’ या १९६९ मध्ये आलेल्या चित्रपटामधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणाऱ्या अमिताभला बॉलिवूडमध्ये आल्याचा अभिमान आहे. अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील आगमनानंतर काही वर्षांनी मात्र, या क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे.
“आजचे अभिनेते आणि अभिनेत्र्यांना पहिल्या चित्रपटतच स्वत:ला सिध्द करावे लागते. आमच्या काळात स्वत:ला सिध्द करण्यासाठी बऱ्याच संधी व चित्रपट मिळत होते. त्यामुळे अभिनयामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्हाला वेळ मिळत होता. मला वाटते मी नशिबवान आहे.”, असे बिग बी  म्हणाले.
आताच्या नव्या पिढीतील अभिनेत्यांबरोबर काम करायला आवडेल अशी इच्छा ७० वर्षीय बच्चन यांनी यावेळी व्यक्त केली.
अमिताभ यांनी कोणत्याही चित्रपट प्रशिक्षण संस्थेमध्ये अभिनयाचे धडे घेतले नसल्याचे त्यांना वाईट वाटते. ” दुर्दैवाने मला शत्रुघ्न सिन्हा, जया यांच्या सारखे अभिनय अकॅडमीमध्ये शिकायला मिळाले नाही. त्या दोघांनी पुण्यातील ‘एफटीआयआय’मधून अभिनयाचे धडे घेतले. मलातर अभिनय प्रशिक्षण संस्था असते हेच माहित नव्हते. जर मला संधी मिळाली असती तर मी देखील अभिनयाचे धडे घेतले असते.”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. व्हिसलींग वूड चित्रपट प्रशिक्षण संस्थेमधील २०० उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. त्यापूर्वी बच्चन यांना ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घईंच्या हस्ते ‘व्हिसलींग वूड मेएस्ट्रो’ पुरस्कार गेऊन गौरवण्यात आले.
 “मी विज्ञान आणि गणित विषयांमध्ये वर्गामध्ये पहिला येत असे. वैज्ञानिक बनायचे मी  ठरवले होते. मात्र, कॉलेजमधील पहिल्या दिवशीच माझा निर्णय मी बदलला आणि आज मी या ठिकाणी उभा आहे.”, असे आपल्या शालेय जीवना विषयी बोलताना बच्चन म्हणाले.