बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सातत्याने चर्चेत असतात. गेल्या वर्षी, त्यांचा 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यानंतर दक्षिणेतील 'कार्तिकेय 2' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. नुकतंच अनुपम यांनी दिल्लीत आयोजित ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात हजेरी लावली आणि यात त्यांनी काश्मिरी लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अनुपम खेर यांनी ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्हमध्ये 'द काश्मीर फाइल्स' बद्दलही सांगितले. आपल्या एकंदर अनुभवाबद्दल ते म्हणाले, "काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या समस्या दाखवल्या आहेत. आम्ही या चित्रपटातून प्रचंड नफा खूप कमावले आहे. आपण आधीच परदेशी संस्थांना दान करून त्यांना श्रीमंत केलं आहे. आता आपल्या लोकांना, प्रियजनांना दान करणे आवश्यक आहे आणि याच काश्मिरी पंडितांसाठी मी ५ लाख रुपये देण्याचे वचन देत आहे." आणखी वाचा : 'हेरा फेरी ३' नव्हे तर 'हेरा फेरी ४'च्या चित्रिकरणाला सुरुवात; 'हा' अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका दिल्लीमध्ये पार पडलेल्या या समारंभात अनुपम खेर यांच्या या कृतीचे संपूर्ण देशातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. काही लोकांनी नेहमीप्रमाणे अनुपम खेर यांच्या या कृतीला राजकीय रंग देऊन त्यांना ट्रोलही करायचा प्रयत्न केला आहे. याआधीसुद्धा अनुपम यांनी काश्मिरी पंडितांसाठी कार्य केले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांच्या खऱ्या समस्या समोर आल्या. या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होईल तरी आजही जनमानसावर या चित्रपटाचा प्रभाव अजूनही आढळतो. बऱ्याच लोकांनी या चित्रपटातील दाहक वास्तव स्वीकारण्यासही नकार दिला ज्यामुळे चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. अनुपम खेर आता विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी 'द व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.