Piyush Mishra unconditional apology for JNU Movie: बॉलीवूड अभिनेते व लेखक पीयूष मिश्रा यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जेएनयू’ (जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी) सिनेमात काम केल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. ‘जेएनयू’ हा एक वादग्रस्त चित्रपट होता, हा प्रोपगंडा सिनेमा असल्याची टीकाही समीक्षकांनी केली होती. कम्युनिस्ट लोकांबद्दल द्वेष असल्यामुळे संपूर्ण स्क्रिप्ट न वाचता ही भूमिका स्वीकारण्याचं मिश्रा यांनी सांगितलं. हा चित्रपट करणे ही चूक होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत पीयूष मिश्रा यांना त्यांच्या कम्युनिस्ट भूतकाळाबद्दल विचारण्यात आलं. “त्यावेळी मला त्यापेक्षा चांगलं काही माहीत नव्हतं. मी तेव्हाही कम्युनिस्ट विचारसरणीचं समर्थन करत नव्हतो, पण त्याकाळी माझ्याकडे स्वतःचे कोणतेही व्यक्तिमत्व नव्हते, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचे अनुसरण करण्याशिवाय पर्याय नव्हता,” असं ते म्हणाले. अनेक वर्षे पीयूष यांचे पैशांबद्दलचे विचार वेगळे होते, पण मग ते मुंबईत आले व पैसे कमवू लागले. त्यानंतर त्यांचे कम्युनिझमबद्दलचे विचार बदलले.
विचारसरणी इतकी रुजली की…- पियुष मिश्रा
Piyush Mishra on Communism : “ती विचारसरणी माझ्यात इतकी रुजली की मी मुंबईतील काम स्वीकारायचो नाही, मी पैसे घेण्यास नकार द्यायचो. पण जेव्हा माझ्याकडे खायला अन्न नव्हते तेव्हा मला जाणवलं की ही विचारधारा पोकळ आहे. त्यानंतर मी अभ्यास केला व मला आढळलं की या विचारसरणीमुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. माझ्या मनात असलेल्या रागामुळे मी जेएनयू हा चित्रपट केला,” असं ते म्हणाले.
मला माफ करा – पीयूष मिश्रा
ते पुढे म्हणाले, “मी बिनशर्त माफी मागतो, द्वेषामुळे मी हा सिनेमा केला, मला माफ करा. आपण सर्वजण चुका करतो, आपण कोण आहोत किंवा आपले वय किती आहे याने काही फरक पडत नाही. तो एक मूर्खपणाचा क्षण होता आणि मी मूर्खपणात हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. स्क्रिप्ट न वाचता मी होकार दिलेला हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपटात माझा एकच सीन आहे, तरी निर्मात्यांनी माझ्या नावावर तो सिनेमा विकण्याचा प्रयत्न केला. पण मला आता कळालंय की मनात राग धरून ठेवल्याने तो राग वाढतच जातो.”
पीयूष मिश्रा म्हणाले की त्यांना अजूनही डाव्या विचारसरणीचे लोक आवडत नाहीत, कारण त्यांनी त्यांच्याबरोबर काय केलं याची जाणीव आहे. “मी या बाबतीत तडजोड करणार नाही, कारण डाव्यांची लायकी काय आहे ते मला माहीत आहे. हा चित्रपट करणं ही माझी चूक होती,” असं ते म्हणाले.
‘जेएनयू’ चित्रपटात उर्वशी रौतेला, रश्मी देसाई, विजय राज आणि रवी किशन यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित झाला होता.
© IE Online Media Services (P) Ltd