अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या विवाहाला जवळपास चार दशके पूर्ण झाली आहेत. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम यांनी त्यांच्या या दीर्घकाळ टिकलेल्या नात्याबद्दल सांगितले. त्यांच्या नात्याची सुरुवात चंदीगडमध्ये, कॉलेजच्या काळात झाली होती, जेव्हा दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. पुढे मुंबईत पुन्हा भेटल्यानंतर त्यांचे मैत्रीतून प्रेम फुलले. त्यावेळी किरण विवाहित होत्या आणि अनुपम चित्रपटसृष्टीत आपले करिअर घडवण्यासाठी संघर्ष करत होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते, यामुळेच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर एका गहन नात्यात झाले, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संकटांना एकत्रितपणे तोंड दिले.

शुभंकर मिश्रा यांच्याशी संवाद साधताना अनुपम खेर म्हणाले, “मी अविवाहित होतो; किरणचे लग्न झालेले होते, आणि आम्ही १२ वर्षे चांगले मित्र होतो. ती माझी सिनियर होती. ती खूप प्रतिभावान होती. वर्गात पहिली, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आणि राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन खेळाडू होती. मी मुंबईत आलो, आणि विवाहानंतर किरणही मुंबईत आली. आम्ही, म्हणजे मी आणि सतीश कौशिक, किरण आणि तिचे पहिले पती गौतम बेरी यांच्या घरी जेवायला जायचो. किरण आम्हाला टॅक्सी भाड्यासाठी ५० रुपये द्यायची, पण आम्ही ते पैसे वाचवून बसने प्रवास करायचो.”

हेही वाचा… “त्यांनी माझ्याकडे न पाहताच…”, कुणाल खेमूने सांगितला सासूबाई शर्मिला टागोर यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

अनुपम यांनी आठवणींना उजाळा देताना त्यांच्या मैत्रीचं प्रेमात कसं रूपांतर झालं हे सांगितले. ते म्हणाले, “जेव्हा किरण तिच्या लग्नाच्या काळात कठीण प्रसंगातून जात होती, आणि मी एका वाईट नात्यात होतो.जेव्हा माझं नातं संपुष्टात आलं तेव्हा किरण आणि मी एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आम्ही लग्न केले.”

हेही वाचा… Video : बॉलीवूडची ‘स्त्री’ करणार दिवाळीची साफसफाई; मराठमोळ्या शैलीत श्रद्धा कपूर म्हणाली, “घर चकचकीत…”

जेव्हा अनुपम यांना विचारले की त्यांना किरणमध्ये सर्वात जास्त काय आवडतं, त्यांनी उत्तर दिलं, “ती खूप प्रामाणिक आहे—बिनधास्त, प्रामाणिक, सुंदर, काळजी घेणारी आहे. आम्ही सुरुवातीला चांगले मित्र होतो, आणि ही मैत्री पुढे प्रेमात आणि मग लग्नात बदलली.” अनुपम आणि किरण यांनी अनुपमच्या पदार्पणाच्या चित्रपट ‘सारांश’च्या प्रदर्शित झाल्यानंतर एक वर्षात लग्न केलं.