दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला.
राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. मोदी सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाबद्दल सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली असून वेगवेगळ्या स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. ‘इंडिया’चं नाव बदलून ‘भारत’ झाल्यावर काय काय बदल घडू शकतात याबद्दलही जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या विषयाची वेगवेगळी मीम्सदेखील व्हायरल होत आहेत.
आता नुकतंच यावर बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी भाष्य केलं आहे. मीडियाशी संवाद साधताना जॅकी श्रॉफ म्हणाले, “जर कुणी भारतला भारत म्हणत असेल तर काय वाईट आहे. इंडिया असेल तर इंडिया किंवा भारत असेल तर भारत याने काय फरक पडतोय. माझं नाव जॅकी आहे, कुणी मला जॉकी म्हणतं, जेकी म्हणतं पण यामुळे मी नाही बदलणार मी आहे तोच माणूस राहणार आहे, नाव बदलल्याने ओळख कुठे बदलते?”
अद्याप या प्रकरणावर कोणताही ठोस निर्णय समोर आला नसल्याने याची केवळ सोशल मीडियावरच चर्चा आहे.