बॉलिवूडमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आत्महत्या, नैराश्य या गोष्टींवर बरीच चर्चा झाली. कित्येक कलाकारांनी पुढे येऊन त्यांना झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं. दीपिका पदूकोणपासून कित्येक मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी नैराश्याचा सामना केला आहे आणि त्याविषयी त्यांनी उघडपणे वक्तव्यही केलं आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनीदेखील याच संवेदनशील विषयावर त्यांचं मत मांडलं आहे.
कबीर बेदी यांनी त्यांचा मुलगा सिद्धार्थ याने १९९७ साली केलेल्या आत्महत्येबद्दल खुलासा केला आहे. आत्मचरित्र लिहिताना यश आणि अपयश याविषयी मांडताना कबीर बेदी यांना आयुष्यातील सर्वात दुखड दिवस नजरेसमोर आला आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या समस्येबद्दल आणि त्याने झेललेल्या त्रासाबद्दल वक्तव्य केलं आहे. सिद्धार्थ हा कबीर यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता. त्याला स्किझोफ्रेनिया झाल्याचे समोर आले होते. १९९७ मध्ये जेव्हा त्याने आत्महत्या केली तेव्हा तो २६ वर्षांचा होता.
आणखी वाचा : FIFA World Cup 2022 : उद्घाटन सोहळ्यात असणार सेलिब्रिटीजची मांदियाळी; अभिनेत्री नोरा फतेही करणार परफॉर्म
‘आज तक’च्या एका कार्यक्रमात कबीर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले, “मी पुस्तकात जे काही लिहिले आहे ते अगदीमाझ्या मनापासून आहे. मी माझ्या आयुष्यातील वाईट गोष्टी आणि घटनांबद्दलही सविस्तर लिहिले आहे. त्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही कारण मी जे काही लिहिले आहे ते सत्य आहे आणि त्यांना ते माहीत आहे. तिथे लपवण्यासारखे काही नाही.”असं कबीर म्हणाले.
आयुष्यातील अपयश आणि मुलाच्या आजाराविषयी बोलताना कबीर म्हणाले, “मी पुस्तकात लिहिलेल्या माझ्या काही चुकांमध्ये सर्वस्वी माझा वाटा आहे. चुकीच्या गुंतवणुकीमुळे माझे मोठे नुकसान झाले. जेव्हा माझा मुलगा स्किझोफ्रेनियाचा सामना करत होता तेव्हाच या समस्या एकदम अंगावर आल्या. मी माझ्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण मी त्यात असफल ठरलो आणि याचा पश्चात्ताप मला आजही होतो. त्याकाळात मी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो आणि तेथून मी स्वतःला कसे बाहेर आणले हे माझं मलाच ठाऊक आहे.”
कबीर बेदी यांनी १९७१ मध्ये ‘हलचल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८० च्या दशकातील इटालियन टीव्ही शो सॅंडोकन आणि नंतर ऑक्टोपसी सारख्या चित्रपटांमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय यश मिळाले. १९९० च्या दशकानंतर एका ठराविक साच्यातील भूमिकांकडे वळत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे सुरूच ठेवले.