९०च्या दशकात अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’,’ इश्क’ अशा चित्रपटांतून काजोलने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही काजोल सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या काजोल ही ‘द ट्रायल’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. मात्र नुकतंच काजोलने देशातील राजकीय नेत्यांबद्दल वक्तव्य केले आहे.
काजोल ही सध्या ‘द ट्रायल’ या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकंतच तिने ‘द क्विंट’ या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणाबद्दल भाष्य केले. “देशात असे राजकीय नेते आहेत, ज्यांच्याकडे शिक्षण नाही”, असे वक्तव्य तिने केले.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”
“भारतातील बदल हे फार मंद गतीने होत आहेत, कारण आपण आपल्या परंपरा, विचार यात अडकलो आहोत आणि याचा अर्थातच संबंध शिक्षणाशी आहे. आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत, ज्यांची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन हे पुन्हा सांगेन. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. पण यातील अनेक नेते असे आहेत, ज्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही आणि तो फक्त शिक्षणामुळे येतो”, असे काजोल म्हणाली.
काजोलने केलेल्या या वक्तव्यानंतर तिच्यावर टीका होत आहे. तर काहींनी या वक्तव्यावरुन तिला ट्रोलही केले आहे. दरम्यान काजोल ही ‘द ट्रायल’ या वेबसीरिजद्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. ही वेबसीरिज अमेरिकन कोर्टरूम ड्रामा ‘द गुड वाईफ’चे हिंदी व्हर्जन आहे. यात ती जिशू सेनगुप्ता तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज १४ जुलै प्रदर्शित होणार आहे.