लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’मध्ये अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या या सिनेमातील नवीन गाण्याची चर्चा होत आहे. ‘छावा’मधील ‘आया रे तुफान’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

ए आर रेहमान यांनी ‘छावा’च्या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘आया रे तुफान’ हे गाणं ए आर रेहमान व मराठमोळी गायिका वैशाली सामंत यांनी गायलं आहे. याशिवाय आणखी एक मराठी लेखक ‘आया रे तुफान’ या गाण्याशी जोडला गेला आहे. या लेखकाचं नाव आहे क्षितिज पटवर्धन. यापूर्वी क्षितिजने ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी सुद्दा सांभाळली होती. आता क्षितिजने ‘आया रे तुफान’च्या निमित्ताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लेखकाने खास पोस्ट शेअर करत दिग्गज संगीतकार ए आर रेहमान यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

क्षितिज पटवर्धनची पोस्ट

‘छावा’च्या ‘आया रे तुफान’च्या निमित्ताने…आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मला “माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रे” गाण्याला मिळत असलेल्या प्रेमानं येत असतानाच, छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणार गाणं लिहायची जबाबदारी आली आणि वाटलं आपण खरंच भाग्यवान आहोत की, आपल्याला दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा करता आली.

ए आर रेहमान सरांसह या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, निर्माते दिनेश विजन सर, हे गाणं ज्यांच्या बरोबर लिहायचं भाग्य लाभलं ते इर्शाद कामिल सर, या सगळ्यांचा आजन्म ऋणी आहे. आपली लाडकी गायिका वैशाली सामंत हिने हे गाणं गायलं आहे. ‘छावा’ मराठी मातीने देशाला दिलेली आणखी एक अनमोल देणगी ठरावी, ह्या सदिच्छेसह गाणं सादर करतोय “आया रे तूफान!”

“भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तूफान! एक आंख में पानी, एक में अरमान, आया आया आया रे तूफान!” – क्षितिज

दरम्यान, ‘छावा’च्या चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader