Emraan Hashmi : बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ‘ग्राउंड झिरो’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला इमरान हाश्मीला ‘सीरियल किसर’ म्हटलं जायचं. हा टॅग मिळाल्यानंतर इमरानला याच आशयाचे बरेच चित्रपट मिळाले. ‘सीरियल किसर’ या प्रतिमेमुळेच इमरान चित्रपटसृष्टीत टिकून आहे, असं लोकांना वाटू लागलं. आता इमरान हाश्मीने यावर जाहीरपणे भाष्य केलं आहे. तसेच त्याच्या कोणत्या चित्रपटाने ही प्रतिमा बदलली तेही नमूद केलं.

इमरान म्हणाला, “हा २००८ ते २०१३ पर्यंतचा काळ होता. मी ‘जन्नत २’, ‘राज २’, ‘राज ३’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘मर्डर २’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ असे चार ते पाच एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. ते सर्व चित्रपट समीक्षकांच्या दृष्टीने सरासरी चित्रपट होते. मग मला समीक्षकांनी कौतुक केलेला एक चित्रपट मिळाला जो बॉक्स ऑफिसवर सरासरी होता.”

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये इमरान हाश्मी याविषयी मोकळेपणाने बोलला. ‘शांघाय’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या अभिनय कौशल्याचे खूप कौतुक झाले. लोकांनी भरभरून प्रेम दिलं, तसेच त्याला अनेक पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूही पाठवल्या. इमरान हाश्मी म्हणाला, “लोक म्हणत होते आम्हाला वाटलं की ठिके हा तर फक्त ऑनस्क्रीन किस करू करतो, पण त्याला अभिनयही येतो. तो शांघाय चित्रपट होता. या चित्रपटानंतर समीक्षकांनी माझे खूप कौतुक केले. यशाच्या दृष्टीने तो माझ्या करिअरमधील सर्वोत्तम काळ होता. माझे अनुभव खूप चांगले राहिले. माझ्या करिअरमध्ये मला खूप अनुभव आले.”

‘शांघाय’ हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. दिबाकर बॅनर्जीच्या पॉलिटिकल थ्रिलरमध्ये अभय देओल, फारुख शेख, कल्की कोचलिन आणि प्रोसेनजीत चॅटर्जी यांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात इमरानचा एक वेगळा अंदाज आणि अवतार पाहायला मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, परंतु समीक्षक आणि प्रेक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं होतं. या चित्रपटासाठी इमरान हाश्मीचं प्रचंड कौतुक झालं होतं.