रेश्मा राईकवार

पटाबाबत निश्चित म्हणता येईल. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ पाहतानाही उत्तम व्हीएफएक्स वापरून केलेली चांगली गोष्ट पाहता येईल अशी अपेक्षा होती. काही प्रमाणात ती पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेमकथेत अधिक फसला होता. ‘कल्की २८९८ एडी’मध्ये महाभारताचे संदर्भ घेऊन कल्की अवताराची कथा सांगण्यासाठी व्हीएफएक्सच्या आधारे उभारलेलं एक काल्पनिक विश्व, देशभरातील प्रसिद्ध कलाकारांचा केलेला वापर अशा सगळ्या गोष्टी जमवून आणण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. पण, कुठल्याही भव्य चित्रपटाचा डोलारा हा त्याच्या कथेचा पाया किती मजबूत आहे यावर अवलंबून असतो, इथे मात्र या अतिखर्चीक साय-फायपटाची पुरती भंबेरी उडाली आहे.

कुठलीही काल्पनिक कथा मग ती पुराणकथेच्या आधारावर असो वा स्वातंत्र्यकाळातील असो, व्हीएफएक्सच्या आधारे ते विश्व प्रेक्षकांसमोर कसं उभं करायचं आणि त्यात त्यांना गुंतवून कसं ठेवायचं हे गणित आत्तापर्यंत दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना अचूक जमलेलं आहे. कथेचा कल्पनाविस्तार कुठल्याही पद्धतीचा असला तरी भारतीय मानसिकतेचा विचार करत त्याची बांधेसूद मांडणी आवश्यक असते, त्यानुसार संगीतयोजनाही असायला हवी. त्याबाबतीत नाग अश्विन यांचा चित्रपट अगदीच ढेपाळला आहे. महाभारतात कुरुक्षेत्रावर लढलं गेलेलं युद्ध, अश्वत्थामाच्या हातून उत्तरा आणि तिच्या गर्भातील बाळाची ब्रह्मास्त्राने झालेली हत्या, परिणामी भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याला दिलेला शाप इथून या चित्रपटाची सुरुवात होते. कैक वर्षांनी पृथ्वीवर कलियुगातील पाप, अन्याय यांची चरमसीमा गाठली जाईल तेव्हा विष्णूंचा कल्की अवतार जन्माला येईल. तेव्हा त्या नव्या अवताराला वाचवण्यासाठी तुला लढावं लागेल, असं श्रीकृष्ण अश्वत्थाम्याला सांगतात. त्यानंतर कथा थेट सहा हजार वर्षांनंतरच्या काशी क्षेत्रात येऊन स्थिरावते. लोकांचे पाप धुता धुता आटलेली गंगामैय्या, वैराण वाळवंट झालेलं काशी. या पृथ्वीवरचं जिवंत असं शेवटचं शहर. योगायोग म्हणजे या शहरातही भारत आणि इंडियाप्रमाणे दोन भाग आहे. काशीमध्ये अन्नपाणी, घरदार कशाचा पत्ता नसलेली लोकं इतस्तत: भटकतायेत. याच शहराच्या मधोमध उलट्या पिरॅमिडच्या आकाराचं ‘कॉम्प्लेक्स’ नावाचं एक वेगळंच संस्थान आहे. सुप्रीम यास्कीनने वसवलेलं हे शहर. पृथ्वीवरचे सगळे नैसर्गिक स्राोत शोषून घेऊन आपल्यापुरती हिरवाई जपणाऱ्या या एकमेव शहरात जायचं तर एक कोटी युनिट्स लागतात आणि बंडखोर लोकांना पकडून कॉम्प्लेक्सच्या कमांडरकडे त्यांना सोपवल्यावर युनिट्स माणसांच्या खात्यात जमा होतात. वाईट शक्तींचा महानायक असलेल्या सुप्रिम यास्कीनची एक वेगळी कथा आहे. कल्कीचा जन्म होऊ नये, आपणच महाशक्ती व्हावं म्हणून त्याची सुरू असलेली धडपड, त्याचा भाग म्हणून बंदी बनवल्या जाणाऱ्या गर्भवती बायका, या बायकांमधली एक महत्त्वाची व्यक्तिरेखा ‘सुमती’, कल्कीला जन्म देणाऱ्या मातेच्या शोधात असलेलं आणि कॉम्प्लेक्सच्या नजरेपासून दूर असलेलं बंडखोरांचं शंभाला शहर अशा कित्येक उपकथा आणि व्यक्तिरेखा यात गुंफलेल्या आहेत. त्यात भैरव नामक आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. त्याला येनकेनप्रकारेण कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश मिळवायचा आहे. बाकी तो चांगला की वाईट, त्याचा वरच्या या कथानकाशी काय संबंध? अश्वत्थामा या सगळ्यात श्रीकृष्णाने दिलेल्या जबाबदारीशी कसा जोडला जातो? हे सगळं समजून घेण्यासाठी हा चित्रपटच पाहायला हवा.

हेही वाचा >>> ‘अर्जुन रेड्डी’तील प्रितीला पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हुबेहूब आलिया भट्ट”

महाभारताच्या कुरुक्षेत्रापासून सुरुवात होऊन सहा हजार वर्षांनंतर काशीमध्ये कथानक जोडताना येणारे अनेक उपकथांचे धागे, व्यक्तिरेखा यांचं जाळं विणत विणत जायचं तर तीन तासही कमीच पडतात. पण, नेमकं कथेतून काय सांगायचं याबद्दल स्पष्टता असती तर पूर्वार्धात अभिनेता प्रभासने साकारलेल्या भैरवावर वेळ न दवडता गोष्ट अधिक वेगाने पुढे सरकली असती. भविष्यात घडणाऱ्या या कथानकासाठी उभारलेलं काशी शहर, कॉम्प्लेक्सची रचना, सुप्रीम यास्कीन या खलनायकाला दिलेलं आगळं रूप, काशी-शंभालातील सैनिक, त्यांच्या आकाशात उडणाऱ्या गाड्या, लेझरवाली शस्त्रं सगळं सगळं परीकथेतलं दिपवून टाकणारं विश्व व्हीएफएक्सच्या आधारे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी उत्तम उभं केलं आहे. ते पाहताना ‘ड्यून’, ‘स्टार वॉर्स’, ‘मॅड मॅक्स सागा’ असे कित्येक हॉलीवूडपट डोळ्यांसमोरून सरकतील. त्यातील साम्यस्थळं जाणवतील, सुरुवातीला पाहताना तर यात आपलं काय आहे असंच वाटत राहतं. मात्र उत्तरार्धात सगळ्या गोष्टी या व्हीएफएक्सने उभारलेल्या काल्पनिक विश्वाशी दिग्दर्शकाने उत्तम जुळवून आणल्या आहेत. त्याला पुराणकथा आणि व्यक्तिरेखांचा संदर्भही दिला गेल्याने चित्रपट काही प्रमाणात आपल्याला पकडून ठेवतो. आणि पुढे काय होणार? याविषयची उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी ठरतो.

मात्र प्रेक्षकांना हसवण्यासाठी किंवा टाळ्या वसूल करण्यासाठी पार रामगोपाल वर्मापासून राजामौलीपर्यंत दिग्दर्शकांची वेगवेगळ्या भूमिकेत केलेली पेरणी, डुलकर सलमान-विजय देवरकोंडा, मृणाल ठाकूर कित्येक गाजलेले चेहरे येत-जात राहतात. म्हटलं तर मृणाल ठाकूर, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, प्रभास, कमल हसन, सास्वता चॅटर्जी असे दक्षिणेपासून उत्तरेकडचे सगळे कलाकार यात आहेत. तरीही मूळ चित्रपट तेलुगू भाषेतील असल्याने महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमध्ये दाक्षिणात्य कलाकारांनाच ‘स्टार’ म्हणून मिरवलं गेलं आहे ही गोष्टही दखल घेण्याजोगी म्हणायला हवी. अजिबात श्रवणीय संगीत नसलेल्या या चित्रपटाला सावरण्याचं बरंचसं श्रेय हे महानायक अमिताभ बच्चन यांना द्यायला हवं. अश्वत्थामा या पुराणपुरुषाचं महत्त्व, त्याच्या व्यक्तिरेखेची खोली, त्याचं तेज, त्याची भव्यता सगळं अमिताभ बच्चन यांच्या देहबोलीतून पुरेपूर उतरलं आहे. एआयचा केलेला वापर, व्हीएफएक्ससारख्या आधुनिक तंत्राचा उपयोग करून दिलेली दृश्यं, त्यासाठीची जड वेशभूषा कशा-कशाचंच दडपण न घेता ते अश्वत्थामा ही भूमिका जगले आहेत. त्याउलट, चित्रपटाचा नायक म्हणून मिरवणाऱ्या प्रभासचं पार खेळणं करून टाकलं आहे. दीपिका पदुकोणने तिच्या वाट्याला आलेली सुमतीची भूमिका नेटकेपणाने साकारली आहे. कमल हासन यांच्या वाट्याला या चित्रपटात आलेल्या एक-दोन दृश्यांमध्येही त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. दिशा पटानी चित्रपटात होती का? आणि का होती? दोन्ही प्रश्न अनुत्तरित राहतात. हा नको तो मसाला वापरण्याचा मोह टाळून पटकथेवर अधिक मेहनत केली असती तर हा नवा कथा आणि तंत्रप्रयोग अधिक सार्थकी लागला असता. हे सगळे कच्चे दुवे मान्य करूनही ‘कल्की २८९८ एडी’ हा एक नवा प्रयोग म्हणून एकदा तरी पाहायलाच हवा.

कल्की २८९८ एडी

दिग्दर्शक – नाग अश्विन

कलाकार – अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, विजय देवरकोंडा, कमल हासन, सास्वत चॅटर्जी.