'कल्की 2898 एडी' हा यंदाच्या वर्षीच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं असून, अश्विनी दत्त यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाबद्दल सध्या प्रेक्षकांच्या मनात प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट या एकाच सिनेमात झळकली आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमात असे काही खास प्रसंग घडले ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. असाच एक प्रसंग अमिताभ बच्चन यांच्याबाबत घडला तो नेमका काय आहे जाणून घेऊयात… अमिताभ बच्चन मुंबईत पार पडलेल्या भर कार्यक्रमात अश्विनी दत्त यांच्या पडले. मेगास्टार अमिताभ बच्चन एका व्यक्तीच्या पाया पडतात हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील अमिताभ यांना इतर कोणत्याही निर्मात्यासाठी असे करताना पाहिले नसल्याचं म्हटलं आहे. आता यावर अश्विनी दत्त यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा : Video : “माझे प्रिय नवरोबा”, देशमुखांच्या सुनेची वटपौर्णिमा! जिनिलीया म्हणते, “रितेश तुम्हाला माझं आयुष्य…” 'कल्की 2898 एडी'चे निर्माते अश्विनी दत्त यांनी अमिताभ बच्चन यांच्या पाया पडण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक मेसेज शेअर केला आहे. "अमिताभजींपेक्षा मोठं काहीच नाही. कालच्या कार्यक्रमातील तो क्षण माझ्यासाठी खूपच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होता. अमिताभजी यांच्या कृतीचे, नम्रपणाचे आणि त्यांनी दाखवलेली उदारता याचा मी खूप आदर करतो" अश्विनी यांनी अशी पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे. मनोरंजन विश्वातील अशा दोन दिग्गजांमध्ये असलेला आदर पाहून सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. 'कल्की 2898 एडी' हा भारतातील बिग बजेट चित्रपट असणार आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. संतोष नारायणन यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. त्याचबरोबर अश्विनी दत्त यांनी वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हेही वाचा : “IPL मध्ये धुमाकूळ घालत होते अन् आता…”, विराट-रोहितच्या कामगिरीबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला… कोण आहेत अश्विनी दत्त? अश्विनी यांचं टॉलीवूडमध्ये सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यांनी वैजयंती मुव्हीजची स्थापना १९७४ मध्ये केली होती. त्यांना स्वप्ना, प्रियांका, स्रावंती अशा तीन मुली आहेत. यातील प्रियांकाचे लग्न नाग अश्विनशी झाले आहे. यांनीच 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चिरंजीवी आणि श्रीदेवी यांचा सुंदरी हा चित्रपट वैजयंती मुव्हीजने बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.