कंगना रनौत तिच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी तिनं अप्रत्यक्षरीत्या आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटावर टीका केली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ‘जिगरा’ ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटानं पहिल्या दिवशी अवघ्या ४.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमविल्याची माहिती आहे, असे ‘सॅकनिल्क’च्या अहवालात सांगण्यात आलं आहे. ‘जिगरा’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईवर कंगनाने ही अप्रत्यक्षरीत्या टीका करणारी इन्स्टा स्टोरी टाकली आहे, असं बोललं जात आहे.

कंगना रनौतने ‘जिगरा’ सिनेमा प्रदर्शित झाला त्याच दिवशी ही स्टोरी टाकल्यानं या स्टोरीतून अप्रत्यक्षरीत्या आलिया भट्टवरच टीका केली जात असल्याच्या चर्चा आहे.

हेही वाचा…“पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून…”, आलिया भट्टच्या तोंडून कौतुकाचे ‘ते’ शब्द ऐकताच समांथाचे डोळे पाणावले; व्हिडीओ व्हायरल

काय म्हणाली कंगना?

कंगनानं कोणाचंही थेट नाव न घेता पोस्टमध्ये लिहिलं आहे, “जेव्हा तुम्ही स्त्रीप्रधान चित्रपटांची वाट लावता, तेव्हा ते चालत नाहीत. अगदी तुम्ही ते स्वत: बनवले तरीही. पुन्हा वाचा. धन्यवाद.” या पोस्टमध्ये कंगनानं कोणाचंही नाव घेतलेलं नसून, पोस्ट टाकण्याची वेळ पाहता, ‘जिगरा’ आणि आलिया भट्टच्या या सिनेमातील भूमिकेवर हा अप्रत्यक्ष टोमणा आहे, अशी चाहत्यांची भावना आहे.

‘जिगरा’ हा आलिया भट्टचा स्त्रीप्रधान सिनेमा आहे. या चित्रपटात आलिया सत्या आनंद ही भूमिका साकारत आहे, जी तिचा भाऊ अंकुर आनंद (वेदांग रैना यानं साकारलेली भूमिका) याला परदेशी तुरुंगातून सोडविण्याच्या मोहिमेवर आहे. अंकुरला तिथं अत्याचार सहन करावा लागत आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं आहे आणि मनोज पाहवा, राहुल रवींद्रन यांच्यासारखे महत्त्वपूर्ण कलाकारदेखील या चित्रपटात झळकत आहेत. आलियाच्या ‘इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन्स’ आणि करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ने सह-निर्मित केलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, पहिल्या दिवसाच्या आकडेवारीवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कंगना रनौतने आलिया भट्टवर इन्स्टाग्राम स्टोरीतून टीका केली आहे अशी चर्चा आहे (Photo Credit : kangana ranaut Instagram)

हेही वाचा…नाकातून रक्त वाहत होतं तरी पाहिला सिनेमा…; अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा, म्हणाले, “माझा आवडता अभिनेता…”

कंगनानं आलिया भट्टवर यापूर्वीही टीका केली आहे. यापूर्वी आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीही कंगनानं या चित्रपटाच्या कास्टिंग आणि निर्मितीवर उघडपणे टीका केली होती, त्याला ‘२०० कोटींचं अपयश’ असं म्हटलं होतं आणि आलियाला ‘रोमकॉम बिंबो’ म्हणून हिणवलं होतं. मात्र, कंगनाच्या टीकेनंतरही ‘गंगूबाई काठियावाडी’नं बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आणि समीक्षकांनीही त्याचं कौतुक केलं.

हेही वाचा…‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा

कंगनाच्या नव्या टिप्पणीचा उद्देश आलिया भट्ट आहे की एकूणच बॉलीवूडमधील महिलाप्रधान चित्रपटांविषयीची ही टीका आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, तिच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं असून, ‘जिगरा’च्या बॉक्स ऑफिसवरील कमाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.