विराट कोहली व अनुष्का शर्मा या दोघांकडे मनोरंजनविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. त्यांचे चाहते प्रेमाने त्यांना ‘विरुष्का’ म्हणतात. विराट व अनुष्का यांना दोन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा बॉलीवूडच्या ग्लॅमरस आयुष्यापासून दूर आहे. कोहली कुटुंबीय भारत देश सोडून लंडन येथे स्थायिक होणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सर्वत्र रंगल्या होत्या. त्यानंतर विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता.

विराट कोहली सध्या फक्त क्रिकेट सामने खेळण्यासाठी आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी मायदेशी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी भाष्य केलं आहे.

‘हेल्थ अँड वेलफेयर’ विषयी माहिती देणारं युट्यूब चॅनेल डॉ. नेने चालवतात. काही महिन्यांपूर्वी ते युट्यूबर रणवीर अलाहबादियाबरोबर पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अनुष्का आणि विराटने भारत सोडून लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला? याविषयी डॉ. नेनेंनी माहिती दिली.

डॉ. नेनेंनी विराट-अनुष्काची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. याबद्दल सांगताना नेने म्हणाले, “ते दोघंही खूपच चांगले आहेत. मी त्यांना अनेकवेळा भेटलो आहे. ते दोघंही तेव्हा लंडनला कायमस्वरुपी शिफ्ट होण्याच्या विचारात होते कारण, ते दोघंही इतके प्रसिद्ध आहेत, त्यांनी भरपूर यश मिळवलंय त्यामुळे इथे राहून त्यांना कुटुंबासह प्रत्येक क्षण वैयक्तिक आयुष्य हवं तसं एन्जॉय करणं शक्य नाहीये. ते पटकन चर्चेत येतात.”

“अनुष्का आणि विराट लंडनला गेले कारण त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांना इथल्या ग्लॅमरपासून दूर ठेवायचं आहे. अनुष्काला दोन्ही मुलांचं अतिशय सामान्यपणे संगोपन करून त्यांना वाढवायचं आहे. ते दोघंही खूपच चांगले आहेत. इथे जरा बाहेर गेलं तरी एखादा चाहता सेल्फी मागतो. अर्थात ही वाईट गोष्ट नाहीये पण, सतत असं होत असल्याने त्रास होऊ शकतो. आता विराट-अनुष्काबरोबर त्यांची मुलंही असतात त्यामुळेच त्यांना या सगळ्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना तो निर्णय घेतला आहे.” असं डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलं.

दरम्यान, विराट-अनुष्काने एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर २०१७ मध्ये लग्न केलं. त्यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. तर, २०२४ मध्ये अकायचा जन्म झाला. या जोडप्याने दोन्ही मुलांचे चेहरे सोशल मीडियावर आजवर रिव्हिल केलेले नाहीत.