बॉलिवूडविषयी सगळीकडेच नकारात्मक गोष्टी बोलल्या लिहिल्या जात आहेत. अभिनेता आमिर खानला तर गेल्या काही दिवसांत याचा चांगलाच अनुभव आला आहे. आमिरच्या चित्रपटाला ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी बॉयकॉट केलं ते पाहता बॉलिवूड पुन्हा असं काही करायचं धाडस करेल असं वाटत नाही. आमिरच्या चित्रपटावर काहींनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी प्रेक्षकांनी हा चित्रपट संपूर्णपणे नाकारला.

सध्या आमिर पुन्हा एका नवीन कारणामुळे प्रेक्षकांच्या आणि खासकरून नेटीजन्सच्या निशाण्यावर आला आहे. आमिर आणि कियारा आडवाणी यांची ‘एयू बँक इंडिया’साठी केलेली एक जाहिरात सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये हिंदू समाजात मुलगी माहेरी सोडून सासरी जाण्याच्या प्रथेला छेद देत मुलगा घरजावई म्हणून मुलीच्या घरात गृहप्रवेश करतो असं दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीमुळे आमिरला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावरून आमिरची आणि त्या बँकेची चांगलीच कानउघडणी केली आहे. यानंतर ही जाहिरात बघून आता मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आमिरचे चांगलेच कान खेचले आहेत आणि त्याला सल्ला दिला की, “भारतीय परंपरा आणि रितीरिवाज यासंदर्भात जाहिरात करताना आमिर खानने यापुढे लक्ष ठेवावं. मी ती जाहिरात पाहिली आहे, माझ्याकडे काही तक्रारीसुद्धा आल्या आहेत. कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचवायचा अधिकार आमिर खानला नाही. हे अजिबात योग्य नाही.”

आणखी वाचा : ‘लायगर’चं अपयश पचवून अनन्याने दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंग केलं पूर्ण; इन्स्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत

आमिरच्या या जाहिरातीमुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा बॉयकॉट ट्रेंड जोर धरू लागला आहे. काही लोकांनी ही जाहिरात शेयर करत आमिरला प्रश्न विचारला आहे की, “तू हलाल प्रथेबद्दल कधी भाष्य करणार?” तसेच विवेक अग्निहोत्री यांच्या ट्वीटलाही लोकांनी शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी तर या बँकेलाच बॉयकॉट करायची मागणी केली आहे.