Vaastav 2 : १९९९ मध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी ‘वास्तव: द रिअॅलिटी’ या गँगस्टर वर आधारित सिनेमासाठी एकत्र काम केले होते, हा चित्रपट खूप यशस्वी ठरला होता. यातील संजय दत्तची रघू ही भूमिका, त्याचा पचास तोला हा डायलॉग तसेच संजय नार्वेकर यांची देडफुट्याही भूमिका आणि सिनेमाची दमदार कथा त्यामुळे हा सिनेमा गाजला. ‘वास्तव’ भारतीय सिनेमातील पहिला गँगस्टर चित्रपट म्हणून ओळखला जातो. आता २६ वर्षांनंतर महेश मांजरेकर ‘वास्तव’चा सिक्वेल तयार करणार आहेत.
‘पिंकव्हिला’ने सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार महेश मांजरेकर यांनी ‘वास्तव’च्या सिक्वेलसाठी एक खास कल्पना तयार केली आहे. हा सिक्वेल म्हणजे मूळ कथेचा पुढचा भाग नसून याच फ्रँचायझीचा एक नवीन चित्रपट आहे. महेश यांनी ‘वास्तव’च्या दुनियेच्या अनुरूप एक कल्पना साकारली असून, ती त्यांनी संजय दत्तबरोबर शेअर केली आहे. संजय दत्त या कल्पनेमुळे खूप उत्साही झाला आहे. महेश सध्या या कल्पनेला संपूर्ण पटकथेत विकसित करण्याचे काम करत आहेत, तर संजय त्याची पूर्ण कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहे,” असे एका सूत्राने सांगितले.
हेही वाचा…“माझ्या पत्नीला वाटतं की मूर्ख आहे”, आर माधवन मराठमोळ्या बायकोबद्दल असं का म्हणाला?
सूत्राने पुढे सांगितले की, सुभाष काळे या चित्रपटाची निर्मिती करणार असून, ‘वास्तव २’च्या शूटिंगला २०२५ च्या अखेरीस सुरुवात करण्याचे नियोजन आहे. “हा दोन नायकांचा चित्रपट असेल, आणि पटकथा फायनल झाल्यानंतर महेश आणि त्यांची टीम तरुण पिढीतील एका अभिनेत्याची दुसऱ्या मुख्य भूमिकेसाठी निवड करतील. सध्या हे सर्व प्राथमिक टप्प्यात आहे, पण ‘वास्तव २’बाबतची चर्चा जोरात सुरू आहे,” असे सूत्राने सांगितले.
सूत्रांनी असेही म्हटले की, ‘वास्तव २’ हा भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या गँगस्टर चित्रपटांपैकी एक ठरेल. जर पटकथा योग्य पद्धतीने साकारली गेली, तर निर्माते या चित्रपटासाठी एका A-लिस्ट तरुण नायकाला घेण्याचा विचार करत आहेत. “२०२५ च्या मध्यापर्यंत कास्टिंगबाबत स्पष्टता येईल. सध्या महेश आणि त्यांची लेखकांची टीम या पटकथेवर काम करत आहेत आणि हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर संवादांनी भरलेला एक हाय-ऑक्टेन गँगस्टर ड्रामा बनवण्याचे प्रयत्न करत आहेत,” असे सूत्राने स्पष्ट केले.
© IE Online Media Services (P) Ltd