मनोरंजनविश्वातील कलाकार हे सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी त्यांनी मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे हे कलाकार मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात.

आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी आणि नेहमी चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने ‘हॅलो मॅगझिनला’ दिलेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मुलगा अरहानचा सांभाळ कसा केला? अरबाज खानबरोबर सहपालकत्व कसे निभावले? याबाबत अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे.

मलायका अरोरा म्हणते, “२०१७ ला जेव्हा आमचा घटस्फोट झाला, तेव्हा आमच्यासाठी तिघांसाठीही तो कठीण काळ होता. आम्ही विभक्त झाल्यानंतर अरहानला कसे वाढवणार, याची आम्हाला काळजी होती. पण, आता आम्हाला माहीत आहे की, नात्यांमध्ये समतोल कसा साधायचा? आमच्या दोघांमध्ये काय घडलं याचा परिणाम अरहानच्या आयुष्यावर पडू द्यायचा नाही, असं आम्ही ठरविलं आहे. त्यामुळे आम्ही सहपालकत्वाचा अनुकूल मार्ग शोधून काढला आहे.” पुढे मलायका म्हणते, “अरहानला वाढविताना त्याच्यात काही मूल्यं रुजावीत यासाठी नेहमी काळजी घेतली आहे. त्याला इतर लोकांबद्दल आदर असायला हवा. याबरोबरच त्याला स्वत:साठी गोष्टी करता यायला हव्यात. अरहानला अनेक गोष्टी सहज मिळू शकतात; मात्र त्या त्यानं स्वत: मिळवाव्यात याचा आम्ही कायम प्रयत्न करतो. त्यानं आर्थिक, भावनिक व वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी असायला हवं. त्याला अडचणी आल्या, जिथे आमची गरज आहे, तिथे आम्ही आहोतच; पण त्यानं कोणावरही अवलंबून राहू नये यावर आमचा पालक म्हणून कटाक्ष असतो. अरहानसारख्या विशेषाधिकार असलेल्या मुलांना सगळंच सहज मिळेल, असा अंदाज बांधला जातो. पण, प्रत्येकानं स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि स्वत:साठी गोष्टी तयार केल्या पाहिजेत”, असेदेखील मलायकाने सहपालकत्वाबद्दल बोलताना म्हटले आहे.

हेही वाचा : Hina Khan Cancer: अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

अरहान एप्रिल २०२४ मध्ये दम बिर्याणी या व्हॉडकास्ट कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
दरम्यान, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी १९९८ साली लग्नगाठ बांधली होती. २००२ मध्ये त्यांच्या आयुष्यात अरहानचे आगमन झाले. मात्र, लग्नाच्या १९ वर्षांनंतर २०१७ ला त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकतीच अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधली आहे; तर मलायका काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करीत आहे.